औरंगाबाद : महापालिका निवडणुकीसाठी अवघे १६ दिवस शिल्लक राहिले असताना मजलिस-ए-इत्तेहाद-उल-मुस्लिमीन (एमआयएम) पक्षाच्या ४४ उमेदवारांची अधिकृत यादी जाहीर होताच शहरात इच्छुक उमेदवारांनी ‘एमआयएम’च्या नेत्यांचे अक्षरश: पानिपत केले. तलवारीने हल्ले, दगडफेक, मारामाऱ्या, स्थानिक नेत्यांना अर्वाच्च भाषेत शिवीगाळ करण्यात आली. एमआयएमची वाताहत राहणारे समर्थक चक्कवर्तमानपत्रांच्या छायाचित्रकारांच्या अंगावर धावून येऊ लागले. रात्री उशिरापर्यंत ‘एमआयएम’मध्ये राडा सुरूच होता.‘एमआयएम’ ने शहरात ६० पेक्षा अधिक जागा लढविण्याचा निर्णय घेतला आहे. काही वॉर्डांमध्ये इच्छुकांची संख्या जास्त होती. त्यामुळे तिकिटासाठी जोरदार रस्सीखेच सुरू होती. मध्यरात्री एमआयएमने दोन स्थानिक उर्दू वर्तमानपत्रांना ४४ उमेदवारांची यादी दिली. यादीमध्ये आपले नाव नसल्याचे लोटाकारंजा वॉर्डातील काही कार्यकर्त्यांच्या लक्षात आले. त्यांनी मध्यरात्रीनंतर ३ वाजता भडकलगेट चौकातील एका हॉटेलकडे मोर्चा वळविला. या हॉटेलमध्ये हैदराबादहून आलेले एमआयएमचे नेते थांबले होते. हॉटेलच्या रूममध्ये शिरून कार्यकर्त्यांनी नेत्यांना बेदम चोप दिला. एकाने तर तलवारच उगारली. हाणामारीत एका कार्यकर्त्याच्या हातावर तलवारीचा वार बसला. परिस्थिती चिघळत असल्याने हॉटेल मालक सलीम मैदेवाला आणि त्यांच्या मुलाने कार्यकर्त्यांना बाहेर काढले. (प्रतिनिधी)
औरंगाबादेत ‘एमआयएम’मध्ये धुमश्चक्री!
By admin | Updated: April 7, 2015 04:17 IST