पुणे : नाव समितीच्या बैठकीला समितीचे सदस्य व अधिकारीच उपस्थित राहत नसल्याने समितीचे कामकाजच होऊ शकत नाही. बऱ्याचदा अधिकाऱ्यांना सुचना देऊनही अधिकारी या समितीच्या बैठकीला गांभीर्याने घेत नाहीत त्यामुळे मुख्यसभेची मान्यता घेऊन नाव समितीच स्थायी समितीमध्ये विलीन करून टाकावी, अशी मागणी नाव समितीचे अध्यक्ष अनिल टिंगरे यांनी निवेदनाद्वारे केली आहे. मुख्य सभेने याबाबतचा निर्णय घ्यावा, असे स्पष्ट करून त्यांनी आपली तीव्र नाराजी व्यक्त केली आहे.शहरातील प्रमुख रस्ते, चौक, क्रीडांगणे, उड्डाणपूल, भवन आणि उद्याने या पालिकेच्या मालकीच्या वास्तू, रस्ते यांना नाव देण्याचा प्रस्ताव नाव समितीसमोर ठेवला जातो. मात्र या समितीकडे आता कोणी फारसे गांभीर्याने पाहतच नाही. गेल्या ४ वर्षांपासून मी या समितीचा अध्यक्ष म्हणून काम पाहत आहे; परंतु या समितीच्या बैठकांना सभासद व अधिकारी पुरेशा संख्येने उपस्थित राहत नसल्याचे अनिल टिंगरे यांनी स्पष्ट केले आहे. वस्तुत: आपल्या निधीतून उभारलेल्या वास्तूला नाव देणे हा सभासदांच्या प्रतिष्ठेचा विषय असतो, मात्र समितीचे सदस्य आणि अधिकारी या समितीच्या बैठकीला अनुपस्थित राहून त्याचे महत्त्व कमी करीत आहेत, अशी भावना टिंगरे यांनी व्यक्त केली आहे.महापालिकेतील स्थायी समिती ही एकमेव अशी समिती आहे, ज्या ठिकाणी आयुक्तांसह सर्व अधिकारी व सभासद आनंदाने उपस्थित राहतात, म्हणून या समितीमध्ये नाव समिती विलीन करण्यात यावी, अशी मागणी अनिल टिंगरे यांनी व्यक्त केली आहे. (प्रतिनिधी)
स्थायी समितीमध्येच नाव समिती विलीन करा
By admin | Updated: April 30, 2016 00:27 IST