मुंबई : ग्रामीण भाग शहरांशी जोडण्याचे उद्दिष्ट ठेवणाऱ्या एसटी महामंडळाने अजब पवित्रा घेतला आहे. फेऱ्यांचे सुसूत्रीकरण करत असल्याचे कारण देत, चार महिन्यांत लांब पल्ल्याच्या तब्बल ७00 बस फेऱ्यांवर गदा आणली आहे. अनेक आगारांतून सुटणाऱ्या फेऱ्यांवर गदा आल्याने आगारांचे उत्पन्न घटले आहे. परिणामी, आगारातील कर्मचाऱ्यांच्या पगारांपुढेही प्रश्नचिन्ह निर्माण झाले आहे.प्रवासी संख्या व उत्पन्न वाढीसाठी एसटी महामंडळाकडून प्रयत्न केले जात असून, अनेक सोईसुविधा दिल्या जात आहेत. एकीकडे सोईसुविधांचा वर्षाव केला जात असतानाच, दुसरीकडे थेट प्रवासी नसल्याने फेऱ्यांच्या सुसूत्रीकरणाचे कारण पुढे करत, लांब पल्ल्याच्या अनेक फेऱ्या कमी केल्या जात असल्याची बाब समोर आली आहे. एप्रिल ते जून हा गर्दीचा काळ मानला जातो. मे महिन्यापासूनच लांब पल्ल्याच्या फेऱ्या कमी करण्यास एसटी महामंडळाकडून सुरुवात करण्यात आली. मुंबई, ठाणे, भिवंडी, शहापूर, कल्याण, मुरबाड, विठ्ठलवाडी, वाडा, सिंधुदुर्ग, धुळे, रत्नागिरी विभाग व आगारांतील बस फेऱ्यांवर तर गदाच आणण्यात आली. जवळपास ५७ ते ७५ टक्के प्रत्येक आगारांतील फेऱ्यांचे भारमान असताना, फेऱ्या कमी करण्यात येत असल्याचे कर्मचाऱ्यांकडूनही आश्चर्य व्यक्त केले जात आहे. २0१६ मधील मे ते आॅगस्ट या चार महिन्यांत जवळपास ७00 फेऱ्यांवर गदा आणण्यात आल्याचे एसटीतील सूत्रांकडून सांगण्यात आले. त्यामुळे काही आगारांचे उत्पन्न कमी होतानाच, तेथील कर्मचाऱ्यांचे पगारही उशिरा होऊ लागले आहेत. धुळे विभागातील दहा आगारांपैकी सहा आगारांत याच कारणांमुळे कर्मचाऱ्यांचे पगार उशिराने झाले. हीच परिस्थती सिंधुदुर्ग व रत्नागिरीत निर्माण झाली. सुसूत्रीकरणाच्या नावाखाली फेऱ्यांवर गदा आणली जात असल्याने, खासगी ट्रॅव्हल्स कंपन्यांना प्राधान्य देण्याचा तर हा प्रयत्न नाही ना, असा प्रश्नही उपस्थित झाला आहे. (प्रतिनिधी)
एसटीच्या ७00 फेऱ्यांवर गदा
By admin | Updated: September 14, 2016 06:04 IST