अकोला : अखिल भारतीय मराठी साहित्य संमेलनाची निवडणूक आता अंतिम टप्प्यात आहे. अध्यक्षपदाच्या उमेदवारांच्या प्रचाराच्या फैरी चांगल्याच झडू लागल्या आहेत. विदर्भातील उमेदवार शेती-मातीचे कवी डॉ. विठ्ठल वाघ आणि त्यांचे प्रतिस्पर्धी उमेदवार श्रीपाल सबनीस यांच्यात काट्याची टक्कर असून, मतदारांच्या गाठीभेटी घेऊन आपल्याकडे वळविण्याचा प्रयत्न दोघेही करीत आहेत. पिंपरी चिंचवड येथे होऊ घातलेल्या ८९ व्या अखिल भारतीय मराठी साहित्य संमेलनाच्या अध्यक्षपदासाठी सध्या निवडणुकीची प्रक्रिया सुरु आहे. वर्हाडी कवी विठ्ठल वाघ, ज्येष्ठ लेखक श्रीपाल सबनीस यांच्यासह प्रकाशक अरुण जाखडे, कवी शरणकुमार लिंबाळे व लेखक श्रीनिवास वारुंजीकर हे आपले भाग्य आजमावित आहेत. प्रत्येक उमदेवार आपणच संमेलनाध्यक्षपदासाठी कसे योग्य आहोत, हे मतदारांना पटवून सांगण्याचा प्रयत्न करीत आहेत. सध्या साहित्य वतरूळात जे चित्र आहे ते पाहता विठ्ठल वाघ व श्रीपाल सबनीस यांच्यातच टक्कर होण्याची शक्यता जास्त दिसत आहे. सबनीस यांना मराठा साहित्य परिषदेचा खुला पाठींबा असला तरी, त्यांची संपूर्ण मदार आता आयोजक संस्था व विदर्भ साहित्य संघाच्या मतदारांवर अवलंबून असल्याचे दिसून येते. विठ्ठल वाघ लोकप्रिय कवी असले तरी साहित्यिक मतदारांमध्ये लोकप्रियता मिळविण्यासाठी त्यांना परिश्रम घ्यावे लागत आहेत. आजच्या घडीला विठ्ठल वाघांनी संपूर्ण महाराष्ट्र तसेच महाराष्ट्राबाहेरील भागात जाऊन मतदारांच्या भेटीगाठी घेण्याला प्राधान्य दिले आहे. सध्या त्यांचा अविश्रांत प्रवास सुरु आहे. मतदारांचा कल कुणाकडे आहे, याचे चित्र येत्या आठवडाभरात स्पष्ट होणार आहे. यासंदर्भात जेष्ठ कवी विठ्ठल वाघ यांच्याशी संपर्क साधला असता त्यांनी मतदारांच्या भेटीला माझे प्राधान्य असून आतापर्यंत संपूर्ण महाराष्ट्र पिंजून काढला असल्याचे सांगीतले. परराज्यातील मतदारांच्याही भेटी घेतल्या आहेत. लोकनेते शरद पवार यांनी नागपूर येथे शेती, मातीचा कवी म्हणून माझ्याबद्दल गौरवोद्गार काढले आहेत. त्यांच्या शुभेच्छा माझ्या पाठीशी असल्याने, मी आश्वस्त असल्याचे त्यांनी स्पष्ट केले.
मराठी साहित्य संमेलन निवडणुकीच्या प्रचारात रंगत
By admin | Updated: September 24, 2015 01:10 IST