लातूर : लातूर शहरासह केज, अंबाजोगाई, धारूर, कळंब, मुरुड, शिराढोण आदी मोठ्या गावांना पाणीपुरवठा करणारा मांजरा प्रकल्प यंदा कोरडाठाक आहे. धरणक्षेत्रात गेल्या महिनाभरात केवळ ९० मि.मी. पाऊस झाला.सन १९८१ साली बांधण्यात आलेल्या या धरणाची साठवण क्षमता २२४.०९ दसलक्ष घनमीटर आहे. गेल्या ३५ वर्षांत फक्त अकरा वेळा हे धोरण ओव्हरफ्लो झाले आहे. २०११ नंतर कमी पर्जन्यमान झाल्यामुळे धरण पूर्ण क्षमतेने भरू शकले नाही. त्यामुळे या प्रकल्पावर अवलंबून असलेल्या गावांना पाणीटंचाईचा सामना करावा लागला आहे. यंदा जून उलटला तरी, धरण क्षेत्रातील पाटोदा, नेकनूर, कळंब, वाशी आदी भागांत पावसाचे प्रमाण कमीच आहे. गेल्या महिनाभरात प्रकल्प क्षेत्रावर ९० मि.मी.च्या आसपास पाऊस झाला आहे. हा पाऊस एकाच दिवसात झाला तर धरणात पाणी येईल, असे शाखा अभियंता अनिल मुळे यांनी सांगितले. (प्रतिनिधी)
मांजरा धरण भरेना!; प्रकल्प क्षेत्रात केवळ ९० मिमी पाऊस
By admin | Updated: July 8, 2016 00:41 IST