नाशिक : राष्ट्रीय सुरक्षा तपास यंत्रणेने मालेगाव बॉम्बस्फोटातील संशयित आरोपी साध्वी प्रज्ञासिंह यांना क्लीन चिट देणे म्हणजे शहीद हेमंत करकरे यांचा अपमान आहे. सरकारने एटीएसने केलेला तपास सार्वजनिक करावा, सत्य जनतेसमोर येईल, असे आव्हान महाराष्ट्र प्रदेश काँग्रेसचे अध्यक्ष खा. अशोक चव्हाण यांनी दिले आहे.दहशतवादविरोधी पथकाचे तत्कालीन प्रमुख हेमंत करकरे यांनी मोठ्या कष्टाने तपास करून या प्रकरणाचा छडा लावला होता. सहा महिन्यांपूर्वीच रोहिणी सालियन यांनी या तपासात आपल्यावर दबाव येत असल्याचे वक्तव्य केले होते. त्याचवेळी या प्रकरणाचा तपास नेमका कुठे जाणार आहे, हे स्पष्ट झाले होते. आता राष्ट्रीय तपास संस्थेने आता याप्रकरणी घेतलेला यू- टर्न गंभीर आहे. एटीएसने (दहशतवाद विरोधी पथक) केलेला तपास राज्य सरकारने आता जनतसमोर मांडावा, म्हणजे मालेगाव बॉम्बस्फोटातील सत्य सर्वांसमोर येईल, असे त्यांनी सांगितले.राष्ट्रीय तपास संस्था एनआयए म्हणजे सद्यस्थितीत नरेंद्र मोदी इन्व्हेस्टिगेशन संस्था झाल्याचा आरोप अखिल भारतीय काँग्रेसचे राष्ट्रीय सरचिटणीस मोहन प्रकाश यांनी केला. प्रकरणाची संपूर्ण माहिती असलेले तत्कालीन विरोधी पक्षनेते लालकृष्ण अडवाणी यांनी देशासमोेर याप्रकरणी सत्य आणावे, असे आवाहन मोहन प्रकाश यांनी केले. (प्रतिनिधी)
‘मालेगाव स्फोटाचा तपास जाहीर करा’
By admin | Updated: May 15, 2016 05:20 IST