लासुर्णे : ‘‘उद्योग जर देशाबाहेर गेले तर ते आपल्या दृष्टीने चिंताजनक होईल. यासाठी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी ‘मेक इन इंडिया’ची घोषणा केली आहे. ही संकल्पना यशस्वी करण्यात येईल,’’ असे प्रतिपादन केंद्रीय अवजड उद्योगमंत्री अनंत गिते यांनी केले. गोखळी (ता. इंदापूर) येथे फडतरे उद्योग समूहाच्या माध्यमातून फडतरे फॅबटेक प्रा. लि.च्या उद्घाटन कार्यक्रमात ते बोलत होते. या वेळी माजी उपमुख्यमंत्री विजयसिंह मोहिते पाटील, माजी कृषिमंत्री शशिकांत सुतार, माजी सहकारमंत्री हर्षवर्धन पाटील, आमदार दत्तात्रय भरणे, बबनदादा शिंदे, प्रशांत परिचारक, साखर संघाचे अध्यक्ष शिवाजी नागवडे, सोनाई दूधचे अध्यक्ष दशरथ माने, पुणे जिल्हा बँकेचे संचालक अप्पासाहेब जगदाळे, विठ्ठल शुगर कॉर्पोरेशनचे अध्यक्ष संजय शिंदे, माळेगाव कारखान्याचे अध्यक्ष रंजन तावरे, फडतरे नॉलेज सिटीचे अध्यक्ष उत्तम फडतरे, सचिव दत्तात्रय फडतरे, हनुमंत फडतरे, मंगेश फडतरे आदी उपस्थित होते. गिते म्हणाले, की सध्या मॅन्युफॅक्चरिंग इंडस्ट्री अडचणीत आली आहे. उद्योगांची परिस्थिती चिंताजनक आहे. राज्यातील उद्योगांचे दुसऱ्या राज्यात पलायन सुरू आहे. हे पलायन देशांतर्गत ठीक आहे. कारण उद्योग कोणत्याही राज्यात असला तरी आपल्या देशातच आहे. मात्र, देशाबाहेर उद्योग गेल्यास चिंतेची बाब आहे. तीन ते चार वर्षांपासून महाराष्ट्रात दुष्काळाचे सावट आहे. यामुळे शेती व्यवसाय अडचणीत आला आहे. शेती व्यवसायातील रोजगार कमी झाले आहेत. यासाठी शेतीला जोडधंदा म्हणून तरुणांनी कारखानदारी क्षेत्रात उतरावे. फडतरे नॉलेज सिटीचे अध्यक्ष उत्तम फडतरे म्हणाले, हा उद्योगसमूह सुरुवातीला शेती व्यवसायात उतरला. त्यानंतर शिक्षणापाठोपाठ उद्योग व आता अवजड उद्योग क्षेत्रात पदार्पण केले आहे. या उद्योगात चारशे ते पाचशे तरुणांना रोजगार मिळणार आहे. सूत्रसंचालन औदुंबर बुधावले यांनी केले. आभार अध्यक्ष मंगेश फडतरे यांनी मानले. > आजारी उद्योगातील कामगारांना वाऱ्यावर सोडणार नाहीअवजड उद्योग खात्यात ३२ अवजड उद्योग येतात. त्यापैकी ११ उद्योग आजारी आहेत तर उर्वरित २१ उद्योगांची भरभराट होऊन फायदा होईल. या ११ आजारी उद्योगातील कामगारांना वाऱ्यावर सोडणार नाही. १९८७च्या नियमानुसार पगार मिळाला, त्याचप्रमाणे २००७ नियमानुसार ३५ ते ४० लाख रुपये देऊन सेवानिवृत्ती मिळणार आहे, असे आश्वासन केंद्रीय अवजड उद्योगमंत्री अनंत गिते यांनी दिले.मंत्राशिवाय यंत्र सुरू करत नाहीमंत्राला शरण न जाता यंत्राला शरण गेले पाहिजे, असे मत सूत्रसंचालक औदुंबर बुधावले यांनी व्यक्त केले. त्यावर केंद्रीय मंत्री अनंत गिते म्हणाले, या मताशी आपण पूर्णपणे सहमत नाही. आपण मंत्रोच्चार केल्याशिवाय कोणतेही यंत्र सुरू होत नाही. कोणतेही मंत्र म्हटल्याशिवाय यंत्र सुरू करत नाही. त्यामागची भावना म्हत्त्वाची आहे.
‘मेक इन इंडिया’ यशस्वी करणार
By admin | Updated: February 8, 2016 02:07 IST