मुंबई : ‘मेक इन इंडिया’ सप्ताहाच्या माध्यमातून महाराष्ट्रात ८ लाख कोटी रुपयांची गुंतवणूक येणार असल्याचा दावा करणारे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी, आपल्या कार्यकाळात ५० हजार कोटी रुपयांची प्रत्यक्ष गुंतवणूक आणून दाखवावी, असे आव्हान माजी मुख्यमंत्री नारायण राणे यांनी शनिवारी दिले. ते पत्र परिषदेत बोलत होते.जागतिक मंदीच्या काळात कोणत्या कंपन्यांनी किती कोटींच्या गुंतवणुकीचे करार केले, ते कधी गुंतवणूक करणार आहेत, याची विस्ताराने माहिती शासनाच्या वेबसाइटवर टाका आणि जनतेला कळू द्या, असे आव्हानदेखील राणेंनी मुख्यमंत्र्यांना दिले. ‘मेक इन इंडिया’वर कोट्यवधींचा खर्च केला, त्याच वेळी मराठवाड्यातील चाराछावण्या बंद करण्याचे आदेश काढले, हे सरकार सामान्यांचे असल्याचे लक्षण आहे का, असा सवाल राणे यांनी केला.फडणवीस यांच्या मुख्यमंत्रिपदाच्या काळात मराठा समाजाला आरक्षण मिळणार नाही आणि अरबी समुद्रात छत्रपती शिवाजी महाराजांचे स्मारकही उभे राहणार नाही. दोन्ही मुद्द्यांवर सरकार धूळफेक करीत असल्याचा आरोप त्यांनी केला. (विशेष प्रतिनिधी)तर जशाच तसे उत्तरभाजपा आमदाराकडून काँग्रेस उपाध्यक्ष राहुल गांधी यांना गोळ््या घालण्याची भाषा करण्यात येते. सरकारने हे तातडीने थांबवायला हवे, अन्यथा आम्हालाही जशास तसे उत्तर द्यावे लागेल. भाजपाने काँग्रेसला देशभक्ती, देशप्रेम शिकविण्याची गरज नाही. गांधी-नेहरुघराण्याने स्वातंत्र्ययुद्धात सहभाग घेतला आणि नंतरही बलिदान दिले, असे राणे म्हणाले.
‘मेक इन इंडिया’ ही धूळफेक
By admin | Updated: February 21, 2016 02:03 IST