अतुल कुलकर्णी,
मुंबई- लोकमतने उघडकीस आणलेल्या सार्वजनिक आरोग्य विभागातील औषध घोटाळ्याची सखोल चौकशी करुन अंतिम अहवाल द्यावा, असे सांगत अतिरीक्त मुख्य सचिव भगवान सहाय यांनी दिलेला अंतरिम अहवाल मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी फेटाळून लावला आहे. या प्रकरणात आणखी खोलात जाऊन चौकशी करण्याची गरज असल्यानेच आपण सहाय यांना अंतरीम अहवाल न देता पूर्ण अहवाल द्यावा असे सांगितल्याचे फडणवीस यांनी लोकमतशी बोलताना सांगितले.औषध खरेदी घोटाळ्याची चौकशी करत असलेल्या सहाय यांच्या समितीने काही अधिकाऱ्यांना क्लीनचिट दिल्याचे तर वरिष्ठ अधिकाऱ्यांनी चौकशीत सहकार्य केले नसल्याचे वृत्त काही वृत्तपत्रांनी प्रसिद्ध केले आहे. त्यावर मुख्यमंत्री फडणवीस म्हणाले, या बातम्या खोट्या आहेत. त्यात तथ्य नाही. सहाय यांनी अंतरिम अहवाल देऊ केला होता. पण तो अहवाल घेऊन पुढे काय करणार? संपूर्ण चौकशी करण्यासाठी त्यांना नेमले आहे. त्यामुळे त्यांनी सगळ्या प्रकाराची पूर्ण चौकशी करुनच अहवाल द्यावा असे त्यांना सांगण्यात आल्याचे फडणवीस यांनी सांगितले.दरम्यान, विरोधी पक्षनेते धनंजय मुंडे यांनी सहाय यांच्या समितीला विधीमंडळात केलेल्या भाषणाची प्रत पाठवली असून जे मुद्दे भाषणात मांडता आले नाहीत, त्याची वेगळी यादी चौकशी समितीकडे पाठवल्याचे सांगितले. याबाबत सहाय यांच्याशी संपर्क साधला असता ते म्हणाले, आपल्याला मुख्यमंत्र्यांनी संपूर्ण चौकशी करण्याविषयी सांगितले आहे. आपण चौकशी करुन अहवाल सादर करु. या प्रकरणी सचिवांची काही जबाबदारी नाही का? असा सूर काहींनी लावल्याने सचिव सुजाता सौनिक यांनी मुख्यमंत्र्यांना भेटून माहिती देण्याचा प्रयत्न केल्याचे समजते.