डोंबिवली : कल्याण पूर्वेत रहात असलेल्या लीलाबाई दुधकर(६०) व कमलाबाई दुधकर (७०) या महिलांच्या हत्येप्रकरणी नंदकुमार मनोजकुमार साव (२३)या मुख्य आरोपीला अखेर कोळसेवाडी पोलिसांनी बिहारमधून अटक केली. कल्याण न्यायालयाने त्याला आज ८ जुलैपर्यंत पोलीस कोठडी सुनावली.शनिवारी १८ जून रोजी रात्री कल्याण पूर्वेकडील खडेगोळवली परिसरातील गावदेवी मंदिरानजीक असलेल्या दुधकर निवास येथे राहणाऱ्या लीलाबाई व कमलाबाई या नणंद-भावजयच्या डोक्यात काठी मारून त्यांना ठार करण्यात आले. घरातील दोन कॅमेरे, सोन्याचे दागिने व १० हजारांची रोकड असा सुमारे ३ लाखांचा मुद्देमाल घेऊन मारेकरी पसार झाले होते. या प्रकरणी कोळसेवाडी पोलिसांनी आरोपींचा शोध घेण्यासाठी बिहार येथील अरवल गाव गाठले. त्याठिकाणी आरोपी नंदकुमार याच्याकडून चोरीतील दागिने व रोकड असा मुद्देमाल हस्तगत करण्यात आला. मात्र नंदकुमार सापडला नव्हता. आरोपीला आश्रय देणे आणि गुन्ह्याच्या मालाची विल्हेवाट लावणे या आरोपाखाली नंदकुमारचे वडील मनोजकुमार साव (५९) याला कोळसेवाडी पोलिसांनी अटक करून मुंबईला आणले. ही बाब मुलगा नंदकुमार याला समजताच त्याने शुक्र वारी २४ जून रोजी बिहार येथील अरवल पोलीस ठाण्यात जावून स्वत:ला पोलिसांच्या हवाली केले व गुन्ह्याची कबुली दिली. माझ्या वडलांचा यामध्ये दोष नसून त्यांना सोडा,अशी विनवणी तो पोलिसांकडे करू लागला. आपण येथे येण्यापूर्वीच विष प्राशन केल्याचे त्याने पोलिसांना सांगितले. लागलीच पोलिसांनी नंदकुमारला तेथील सरकारी रु ग्णालयात दाखल केले. २७ जून रोजी सकाळी तेथील डॉक्टरांनी त्याला डिस्चार्ज देताच कल्याण पोलिसांच्या पथकाने दुपारी साडेबारा वाजता अटक करून मंगळवारी सकाळी मुंबई कल्याण येथे आणले. मंगळवारी सकाळी कल्याण न्यायालयाने त्याला ८ जुलैपर्यंत पोलीस कोठडीत ठेवण्याचे आदेश दिले आहेत. (प्रतिनिधी)
मुख्य आरोपीस बिहारमध्ये अटक
By admin | Updated: June 29, 2016 02:51 IST