मुंबई : पार-तापी-नर्मदेच्या खोऱ्यातील ८१३ दलघमी (दशलक्ष घनमीटर) पाण्यापैकी ६०० दलघमी पाणी गुजरातला देण्याचे स्वत: मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी मान्य केले आहे. तसे पत्र त्यांनी केंद्रीय मंत्री उमा भारती यांना लिहिले आहे, असा गौप्यस्फोट माजी मंत्री छगन भुजबळ आणि जितेंद्र आव्हाड यांनी केला. मुख्यमंत्र्यांचे ते पत्रच त्यांनी पत्रकारांना दाखवले. महाराष्ट्राचे पाणी गुजरातला देणार नाही, अशी जर मुख्यमंत्र्यांची भूमिका असेल तर त्यांनी तसा ठराव विधानसभेत आणावा, आम्ही तो एकमताने मंजूर करू; मात्र तसे न करता सभागृहाला सांगायचे एक आणि प्रत्यक्षात पडद्याआड करायचे दुसरेच हे बरोबर नाही, असेही भुजबळ म्हणाले. मुख्यमंत्र्यांचे भाषण होताच आम्ही यावर बोलणार होतो, पण अध्यक्षांनी आम्हाला बोलू दिले नाही. त्यामुळे हे पत्रच आम्ही आपल्याला दाखवत आहोत, असेही भुजबळ-आव्हाड म्हणाले. मुळात आपल्या प्रभावक्षेत्रातल्या पाण्यापैकी मोठा वाटा गुजरातला द्यायचा आणि त्याबदल्यात त्यांच्याकडून गिरणा खोऱ्यात ३०० दलघमी आणि काकरापारा धरणातून ४७० दलघमी पाणी घ्यायचे असे हे पत्र सांगते. रात्री उशिरापर्यंत मुख्यमंत्री कार्यालयाने या पत्राबद्दल कोणताही खुलासा केला नाही.
महाराष्ट्राचे पाणी उत्तर गुजरातला!
By admin | Updated: March 13, 2015 01:48 IST