Maharashtra Election 2019: मुंबईवरील वर्चस्वासाठी युतीची आक्रमक मोर्चेबांधणी

By ऑनलाइन लोकमत | Published: October 18, 2019 05:01 AM2019-10-18T05:01:56+5:302019-10-18T06:39:32+5:30

Maharashtra Election 2019: मनसे, वंचितसमोर अस्तित्वाचा प्रश्न : युतीच्या बंडखोरांमुळे आघाडीला संख्याबळ वाढविण्याची संधी; काँग्रेसचा प्रचार उमेदवार भरोसेच

Maharashtra Election 2019: Alliance's aggressive front for Mumbai to dominate | Maharashtra Election 2019: मुंबईवरील वर्चस्वासाठी युतीची आक्रमक मोर्चेबांधणी

Maharashtra Election 2019: मुंबईवरील वर्चस्वासाठी युतीची आक्रमक मोर्चेबांधणी

Next

कट्या मुंबईत ३६ मतदारसंघ आहेत. केवळ संख्याबळाचा विचार केला तरी विधानसभेतील सत्ता समीकरणांसाठी हा आकडा मोठा आहे. मुंबईतील राजकीय आवाजाचे प्रतिध्वनी मुंबई महानगर परिसरात उमटतात आणि मुंबईसह एमएमआरडीए परिसरातील आमदारांची संख्या आहे ६७. त्यामुळे सत्तेचा मार्ग मुंबईतूनच जातो, असे म्हणणे अतिशयोक्ती ठरणार नाही. १९९५ नंतरचे निकालही हेच दाखवितात. ही जाणीव असल्यानेच भाजप आणि शिवसेनेने येथे आपली शक्ती पणाला लावली आहे; तर काँग्रेस-राष्ट्रवादी आघाडी आपला प्रभाव दाखविण्याच्या प्रयत्नात आहे.

मधल्या काळातील कटुतेचा फटका बसणार नाही, यासाठी लोकसभेवेळी युतीच्या नेत्यांनी विशेष काळजी घेतली होती. इच्छुकांची गर्दी पाहता विधानसभेत अडचण होईल, हा कयाससुद्धा दोन्ही पक्षांनी खोटा ठरविला. कमालीचा समजूतदारपणा दाखवत जागावाटपाचा तिढा सोडविण्यात आला. मुंबईतील ३६ पैकी सर्वाधिक १९ जागा शिवसेनेकडे, तर भाजपकडे १७ जागा आल्या. जागावाटपात शिवसेनेला झुकते माप मिळाले. सध्या मुंबईत भाजपचे १५ तर शिवसेनेचे १४ आमदार आहेत यावरून युतीतील समन्वयाचा अंदाज यावा. जागावाटपातील शिवसेना या मोठ्या भावापुढे निकालातही हे थोरलेपण राखण्याचे मोठे आव्हान आहे.

आदित्य ठाकरे यांच्या रूपाने पहिल्यांदाच ठाकरे घराण्यातील व्यक्ती निवडणुकीच्या रिंगणात उतरली. त्यांच्या उमेदवारीमुळे वरळी मतदारसंघाकडे साऱ्यांचे लक्ष लागले. येथे राष्ट्रवादीने सुरेश माने यांना उमेदवारी देत त्यांच्यामागे महाआघाडीची ताकद लावण्याचा प्रयत्न चालविला आहे. घटनेचे अभ्यासक म्हणून मध्यम आणि सधन दलित कुटुंबांत माने यांची प्रतिमा चांगली आहे. परंतु, वरळीसह आजूबाजूच्या मतदारसंघांतील शिवसेनेचे पक्षसंघटन आणि ‘ठाकरे’ या आडनावाचा करिष्मा यामुळे मुंबई शहरात शिवसेना चार्ज झाल्याचे चित्र आहे. भायखळा, मुंबादेवी, शिवडी आणि माहिम या मतदारसंघांतील शिवसेनेची पक्षसंघटनाही सक्रिय झाली आहे. त्याचा लाभ तेथील उमेदवारांना होणार आहे. शिवडीत शिवसेनेचे अजय चौधरी पुन्हा एकदा आपले नशीब आजमावत आहेत.

मनसे नेते बाळा नांदगावकर यांची अनुपस्थिती आणि शिवसेनेची पारंपरिक मते यामुळे या मतदारसंघात हवी तशी रंगत नाही. काँग्रेसचे उदय फणसेकर आणि मनसेचे संतोष नलावडे शिवसेनेला तुल्यबळ लढत देताना दिसलेले नाहीत. मनसेमुळे माहिममधील लढत मागील दोन निवडणुकांमध्ये चर्चेचा विषय ठरली होती. यंदा शिवसेनेने सदा सरवणकर यांनाच रिंगणात उतरविले आहे. तर, मनसेकडून माजी आमदार नितीन सरदेसाई यांच्या जागी संदीप देशपांडे मैदानात आहेत. दोन्ही उमेदवारांनी पूर्ण ताकद लावली आहे.

चेंबूरमध्ये शिवसेनेचे आमदार प्रकाश फातर्पेकर विरुद्ध काँग्रेसचे चंद्रकांत हंडोरे अशी लढत आहे. विक्रोळीत शिवसेनेचे सुनील राऊत विरुद्ध राष्ट्रवादीचे धनंजय पिसाळ आमनेसामने आहेत. तर, भांडुपमध्ये अशोक पाटील यांचा पत्ता कट करून सेनेने रमेश कोरगावकर यांना संधी दिली आहे. या दोन्ही ठिकाणी शिवसेनेला मतदार सोबत राहील याची काळजी घ्यावी लागणार आहे.

पश्चिम उपनगरातही शिवसेनेच्या दिग्गज उमेदवारांनी सारी शक्ती पणाला लावली आहे. शिवसेनेच्या परंपरागत मतांसोबत उत्तर भारतीय आणि गुजराती-मारवाडी मतांच्या बेगमीसाठी भाजप नेते, पदाधिकारी सोबत असतील, राहतील याची खबरदारी शिवसेनेच्या आमदारांकडून घेतली जात आहे. मागाठाणेत प्रकाश सुर्वे, जोगेश्वरी पूर्वेत रवींद्र वायकर, दिंडोशीत सुनील प्रभू या शिवसेना आमदारांनी आपली सारी शक्ती पणाला लावली आहे. तर, कुर्ला येथे मंगेश कुडाळकर आमदारकी राखण्यासाठी झटत आहेत.

विनोद तावडे यांना नाकारलेली उमेदवारी हा भाजपच्या गोटातील मोठा विषय ठरला. त्यांच्या जागी बोरीवलीतून सुनील राणे यांना उमेदवारी देण्यात आली. तसेच घाटकोपर पूर्वेतून माजी गृहनिर्माण मंत्री प्रकाश मेहता यांना डावलून पराग शहा यांना उमेदवारी देण्यात आली. कुलाब्यातून राज पुरोहित यांच्या जागी राहुल नार्वेकर आणि मुलुंड येथून सरदार तारा सिंग यांच्याऐवजी मिहीर कोटेचा यांना उमेदवारी देण्यात आली. भाजपने चार विद्यमान आमदारांचा पत्ता कट केला. या निर्णयांमुळे निकालांवर काही परिणाम होईल, अशी स्थिती नव्हती. कार्यकर्त्यांमधील नाराजीची धार निवडणुकीच्या रणधुमाळीत बºयाच अंशी बोथट झाली आहे.

कुलाबा येथे राज पुरोहित यांना बाजूला सारत भाजपने राहुल नार्वेकरांना संधी दिली. येथे काँग्रेसने भाई जगतापांसारखा तगडा उमेदवार उतरविल्याने लढाई अटीतटीची बनली आहे. घाटकोपर पश्चिमेत राम कदम मैदानात आहेत. तर, सायन कोळीवाड्यात तमीळ सेल्वन यांच्यावर भाजपने पुन्हा एकदा विश्वास टाकला आहे. मात्र, नाराज इच्छुकांकडून दगाफटका होणार नाही, याची काळजी त्यांना घ्यावी लागणार आहे. कालीदास कोळंबकर वडाळ्यातून पुन्हा एका विजयासाठी मोर्चेबांधणी करीत आहेत. स्थानिक पातळीवर नाराजी असली तरी अंतर्गत गटबाजीत अडकलेल्या काँग्रेसला त्याचा लाभ उठविता येईल, अशी शक्यता नाही.

चारकोप येथे योगेश सागर, कांदिवली पूर्वेत अतुल भातखळकर, अंधेरी पश्चिमेत अमित साटम, विलेपार्ले येथे पराग अळवणी या दिग्गज उमेदवारांनी आपापल्या मतदारसंघांत दगाफटका होणार नाही यासाठी मोर्चेबांधणी केली आहे. दहिसरमध्ये मनीषा चौधरी यांना भाजपसोबत शिवसैनिकांनाही सोबत घ्यावे लागणार आहे. शिवसेनेने विनोद घोसाळकरांना श्रीवर्धनची उमेदवारी दिल्याने शिवसैनिकांना चौधरींना साथ देण्यात विशेष अडचण नाही. तर, वांद्रे पश्चिमेत दमदार विरोधकांअभावी भाजप नेते आशिष शेलार निर्धास्त असल्याचे कार्यकर्त्यांचे म्हणणे आहे. येथील काँग्रेसचे माजी आमदार बाबा सिद्दीकी यांनी निवडणुकीत माघार घेतली, तर मुलगा झीशानला वांद्रे पश्चिमऐवजी पूर्वेत धाडल्याने शेलारांसाठी मार्ग मोकळा झाला आहे.

काँग्रेससाठी धारावीत आमदार वर्षा गायकवाड, मुंबादेवीत आमदार अमिन पटेल, चांदिवलीत आमदार नसीम खान या तीन जागी आशेचा किरण दिसत आहे. अमिन पटेल आणि वर्षा गायकवाड या दोघांनी लोकसभा निवडणुकीत आपल्या मतदारसंघांत काँग्रेस उमेदवाराला आघाडी दिली होती. अमिन पटेल यांच्या मुंबादेवीत तब्बल ३० हजारांचा लीड होता. हे मताधिक्य तोडण्याचे मोठे आव्हान शिवसेनेचे पांडुरंग सकपाळ यांच्यासमोर आहे. सायन कोळीवाड्यात गणेश यादव तुल्यबळ लढत देत आहेत. त्यामुळे येथील लढत अटीतटीची झाली आहे. चांदिवलीत नसीम खान यांच्यासमोर शिवसेनेचे दिलीप लांडे उभे आहेत. खंडीभर अपक्ष, छोट्या उमेदवारांमुळे मतविभागणीचा फायदा उठविता येईल, असा खान यांचा होरा आहे. दोन दशके सत्तेत असल्याने तयार झालेली नाराजी राजकीय खेळीने निष्प्रभ करण्याची खान यांची मनीषा आहे. तर, मालाड येथे अस्लम शेख यांनाच काँग्रेसने रिंगणात उतरविले आहे. ते भाजप आणि शिवसेनेच्या संपर्कात असल्याने तिकीट देणार नसल्याचे काँग्रेस नेते सांगत होते. मात्र, दुसरा उमेदवारच नसल्याने शेवटी शेख यांनाच उमेदवारी द्यावी लागली. त्यांच्याविरोधात भाजपने रमेशसिंग ठाकूर यांना संधी दिली आहे. त्यांच्यावर ‘बाहेरचा’ असा शिक्का मारून प्रचार सुरू आहे.

अणुशक्तीनगरमधील लढाई राष्ट्रवादीच्या नवाब मलिकांमुळे रंगतदार बनली आहे. मात्र, संजय दिना पाटील आणि सचिन अहिर यांचे पक्षांतर, सहकार्य सेनेच्या उमेदवाराच्या मदतीला येण्याची चिन्हे आहेत. समाजवादी पक्षाचे प्रदेशाध्यक्ष अबू आझमी शिवाजीनगर - मानखुर्दमधील गड वाचविण्यासाठी मैदानात आहेत. भायखळ्यात वारिस पठाणांसमोरही आव्हान आहे. दोन्ही उमेदवारांनी पडद्यामागून सहकार्याची रणनीती राबविण्याचे धोरण स्वीकारले आहे. मुस्लीम मते फुटू नयेत यासाठी झालेली ही छुपी आघाडी यशस्वी होते का, हे निकालातून स्पष्ट होईल.

मनसे व वंचित बहुजन आघाडीचे स्वत:चे स्थान आहे. राज ठाकरे यांच्या सभांना मिंळणारा प्रतिसाद आणि प्रकाश आंबेडकरांचा व्यक्तिगत करिष्मा असला तरी त्यातून विजय खेचून आणता येईल, अशी संघटनेची उतरंड खाली नाही. त्यामुळे मुंबईतील काही जागांवर चुरस निर्माण झाली, तरी त्यासाठीचे कार्यकर्त्यांचे बळ ही या पक्षांपुढची अडचण आहे. सध्या तरी दोन्ही पक्षांनी चुरस वाढवली आहे.
बंडखोरांमुळे तीन जागांवर चुरस

वांद्रे पूर्वेतील शिवसेनेच्या विद्यमान आमदार तृप्ती सावंत यांचे बंड शिवसेनेच्या अधिकृत उमेदवाराची डोकेदुखी ठरत आहे. शिवसेनेने येथे मुंबईचे महापौर विश्वनाथ महाडेश्वर यांना उमेदवारी दिली आहे. शिवसेनेच्या राजुल पटेल यांच्या बंडखोरीमुळे वर्सोव्यात भाजप उमेदवार आमदार भारती लव्हेकर, काँग्रेसचे बलदेवसिंग खोसा अशी तिरंगी लढत बनली आहे. अंधेरी पूर्वेत शिवसेनेचे विद्यमान आमदार रमेश लटके यांच्याविरुद्ध भाजपच्या मुरजी पटेल यांनी बंडखोरी केली
आहे.

मुंबईत कोणताही एकच प्रश्न संपूर्ण शहर आणि उपनगराचा प्रचार व्यापून आहे, असे दिसत नाही. ही निवडणूक कोणत्याही एका मुद्द्याभोवती फिरताना दिसत नाही. त्या त्या

Web Title: Maharashtra Election 2019: Alliance's aggressive front for Mumbai to dominate

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.