अतुल कुलकर्णी । लोकमत न्यूज नेटवर्कमुंबई : राज्यात ४ हजार मेगावॅट विजेचा तुटवडा निर्माण झाला असून त्याचा फटका राज्यातील शेतकऱ्यांना बसला आहे. ग्रामीण भागात लोडशेडिंग दोन तासांनी वाढविण्यात आले असून कृषिपंपांना आता रात्री १ नंतर वीज मिळणार आहे. त्यामुळे शेतकऱ्यांना रात्रीचा दिवस करावा लागणार आहे.वीजपुरवठ्यासाठी राज्यात १३ झोन करण्यात आले असून त्यानुसार वेळापत्रक आखण्यात आले आहे. राज्यात ४ हजार मेगावॅट विजेचा तुटवडा निर्माण झाला असला तरी १५०० मे.वॅ. पर्यंत तात्पुरते भारनियमन केल्याचा दावा महावितरणने केला आहे. राज्याला ९९०६ मेगावॅट वीज लागते. पण सध्या फक्त ५९०० मे.वॅ. वीज उपलब्ध होत आहे. आजवर रात्री ९ च्या सुमारास वीज पुरवठा सुरु होत होता. आता ही वेळ पुढे ढकलण्यात आली असून रात्री १ ते पावणेदोनच्या दरम्यान वीजपुरवठा सुरु होईल. पूर्वी १० तास वीज दिली होती; मात्र आता ती ८ तास दिली जाणार आहे. वीज स्थिती बदलताच कृषिपंपांना दिवसा ८ तास व रात्री १० तास वीजपुरवठा करण्यात येईल, असे महावितरणतर्फे सांगण्यात आले.
लोडशेडिंग २ तासांनी वाढले
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: May 9, 2017 02:28 IST