मुंबई : राज्य शासनाच्या मराठी भाषा विभागातर्फे देण्यात येणारा २०१४ सालचा विंदा करंदीकर जीवनगौरव पुरस्कार प्रा.द.मा.मिरासदार यांना, तर श्री. पु. भागवत पुरस्कार केशव भिकाजी ढवळे प्रकाशन यांना जाहीर करण्यात आला. मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी बुधवारी त्यांच्या नावाची घोषणा केली. पाच लाख रुपये, मानचिन्ह व मानपत्र असे विंदा करंदीकर जीवनगौरव पुरस्काराचे स्वरूप आहे. तर तीन लाख रुपये, मानचिन्ह व मानपत्र असे श्री. पु. भागवत पुरस्काराचे स्वरूप आहे. मुख्यमंत्र्यांच्या अध्यक्षतेखालील निवड समितीने त्यांची निवड केली आहे. मराठी भाषा गौरवदिनी म्हणजेच येत्या २७ फेब्रुवारी रोजी रवींद्र नाट्यमंदिर, प्रभादेवी येथे आयोजित समारंभात हे पुरस्कार प्रदान करण्यात येतील. साहित्य क्षेत्रात उल्लेखनीय कामगिरी करणाऱ्या नामवंत साहित्यिकास २०१० या वर्षापासून विंदा करंदीकर जीवनगौरव पुरस्काराने गौरविण्यात येत आहे. २०१४ साठी मिरासदार यांची निवड करण्यात आली आहे. मराठी साहित्य क्षेत्रातील कादंबरी, विनोदी कथा, वगनाट्य, चित्रपट संवाद, विविध विषयांवर लेखन केले आहे. (विशेष प्रतिनिधी)
द.मा.मिरासदार यांना जीवनगौरव पुरस्कार
By admin | Updated: February 26, 2015 02:48 IST