मुंबई : ‘आपण एकदा असे भाष्य केले होते की अधिकारी आपले ऐकत नाहीत पण हे मनाला पटत नाही. आपण सांगितलेल्या अनेक गोष्टी अधिकारी निमूटपणे ऐकतात, असे नमूद करीत माजी उपमुख्यमंत्री छगन भुजबळ यांनी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांना कारागृहातून पत्र पाठविले आहे. नाशिक जिल्ह्यातील मांजरपाडा सिंचन प्रकल्पाचे रखडलेले काम तातडीने सुरू करण्याचे साकडे त्यांनी मुख्यमंत्र्यांना घातले आहे. बेहिशेबी मालमत्ता आणि महाराष्ट्र सदन घोटाळा प्रकरणी भुजबळ सध्या आर्थर रोड कारागृहात आहेत. तिथून लिहिलेल्या पत्रात भुजबळ यांनी म्हटले आहे की, माझ्या ३० वर्षांहून अधिकच्या विधानमंडळाच्या कारकिर्दीत मी कधीही अधिवेशन चुकविलेले नाही. मी कारागृहात असल्याचे आपणास विदितच आहे, म्हणून आज पत्राद्वारे भावना कळवित आहे. मांजरपाडा प्रकल्पाचे काम आघाडी सरकारच्या काळात सुरू झाले होते. काही अंशी धरणाची भिंतही झाली. डोंगरात १० किमीचा बोगदा करून पाणी आणावयाचे होते. बोगद्याचे सुमारे ४०० मीटरचे काम पूर्ण झाले की पाणी महाराष्ट्रात येईल. आघाडी सरकारने ८० कोटी रुपये राखूनही ठेवले होते. परंतु आपल्या कार्यकाळात हे काम बंद आहे. पत्राची प्रत त्यांनी विधानसभेचे अध्यक्ष, विधान परिषदेचे विरोधी पक्षनेते आणि विधानसभेतील राष्ट्रवादीच्या गटनेत्यांनाही पाठविली आहे. (विशेष प्रतिनिधी)
भुजबळांचे मुख्यमंत्र्यांना कारागृहातून पत्र
By admin | Updated: April 8, 2016 02:29 IST