मुंबई : भारतीय राज्यघटनेच्या कलम २५ नुसार जैन समाजाच्या संथारासह सर्व धर्मपरंपरांचे पालन करण्याचा अधिकार बहाल करण्यात आला आहे. देशातील सर्व नागरिकांना धर्मपरंपरेचे पालन करू द्या, असे आवाहन सकल जैन समाजाचे राष्ट्रीय अध्यक्ष खा. विजय दर्डा यांनी केले आहे.जैन समाजाच्या संथारा या धार्मिक व्रतावर बंदी आणण्याच्या राजस्थान उच्च न्यायालयाने दिलेल्या निर्णयावर त्यांनी ही प्रतिक्रिया दिली. न्यायालयाने संथारा या मृत्यूपर्यंत उपवास व्रताला बेकायदेशीर ठरवत कलम ३०६ आणि ३०९ नुसार आत्महत्येचा प्रयत्न आणि आत्महत्येला प्रोत्साहन मानले आहे. आजच्या आधुनिक समाजात संथाराला आत्महत्येसारखे ठरविले जात असेल, मात्र इतिहासात डोकावता हे व्रत पवित्र मानले आहे. त्यात आत्मशुद्धी असून निर्वाणासाठी केलेला त्याग दिसून येतो. जैन धर्माचा तो कायम अंत:स्थ भाग राहिला आहे, असेही खा. दर्डा यांनी स्पष्ट केले. राजस्थान उच्च न्यायालयाच्या निर्णयाला सर्वोच्च न्यायालयात आव्हान देण्याची गरजही त्यांनी प्रतिपादित केली. (प्रतिनिधी)
सर्वांना धर्मपरंपरेचे पालन करू द्या - दर्डा
By admin | Updated: August 12, 2015 01:46 IST