अकोला : राष्ट्रीय छात्र सेना (एनसीसी) देशात वेगाने वाढत असून, अलीकडे एनसीसीचे प्रशिक्षण घेण्याकडे मुलींचाही ओढा वाढला आहे. हे चांगले संकेत असून, भविष्यात हे प्रमाण आणखी वाढेल, असा विश्वास महाराष्ट्र एनसीसीचे अतिरिक्त महासंचालक मेजर जनरल सुबोध कुमार यांनी ‘लोकमत’शी बोलताना व्यक्त केला.सुबोध कुमार यांच्या उपस्थितीत डॉ. पंजाबराव देशमुख कृषी विद्यापीठाचे कुलगुरू डॉ. रविप्रकाश दाणी यांना मानद कर्नल पदवी देण्यात आली. राष्ट्रीय छात्र सेना राष्ट्र निर्मितीसाठी बांधील आहे. राष्ट्रप्रेम तसेच देशसेवेची जबाबदारी विद्यार्थीदशेपासूनच आपल्यावर असते, याची जाणीव कॅडेटस्मध्ये निर्माण केली जाते. या माध्यमातून अनेक कॅडेटस् या तिन्ही दलांमध्ये सेवा देत आहेत. महाराष्ट्रात एनसीसीला चांगला प्रतिसाद आहे. मुलांसोबतच मुलींचेसुद्धा एनसीसीमध्ये सहभागी होण्याचे प्रमाण वाढले आहे; परंतु या तिन्ही दलांमध्ये भरती होण्याचे महाराष्ट्राचे प्रमाण इतर राज्यांच्या तुलनेत कमी आहे, असे त्यांनी सांगितले. कॅडेटला सैन्यदलाच्या लेखी परीक्षेमध्ये काही अंशी सूट दिली जाते. एनसीसीचा अभ्यासक्रम अद्ययावत करण्यावरही भर दिला जात आहे. राज्यात एनसीसीचा विस्तार जलद गतीने होत असून, वाशिम जिल्हा झाल्यापासून येथे स्वतंत्र एनसीसी बटालियन नसल्याने, या जिल्ह्याला एक नवी बटालियन उभारण्यात येत आहे, असेही ते म्हणाले.एनसीसीचे कॅडेट असलेले व देशसेवेची प्रेरणा निर्माण करणाऱ्या अनेकांना मानद कर्नल पदवी देण्यात आली आहे. माजी राष्ट्राध्यक्ष प्रतिभाताई पाटील, पंतप्रधान नरेंद्र मोदी, परराष्ट्र मंत्री सुषमा स्वराज, जया बच्चन, उद्योगपती आदी गोदरेज इत्यादी मान्यवर एनसीसीचे कॅडेटस् राहिलेले आहेत. त्यांनाही मानद कर्नल पदवी दिली असल्याचे त्यांनी सांगितले. (प्रतिनिधी)
राज्यातील मुलींचा एनसीसीकडे ओढा
By admin | Updated: September 22, 2014 02:12 IST