राहुरी (अहमदनगर) : देशभरात कांद्याचे दर शंभरी गाठण्याच्या स्थितीत असताना पाथरे खुर्द येथील शेतकरी भागवत निमसे यांच्या शेतामधील कांदा चाळीतून सुमारे एक लाखाचा दोन हजार पाचशे क्विंटल कांदा बुधवारी रात्री चोरीला गेल्याची घटना उघड झाली आहे.घाऊक बाजारात कांद्याचे सरासरी दर चार हजारांच्या पुढे गेलेले असल्याने किमान यंदा तरी चांगले पैसे होतील, अशी आशा होती. चोरट्यांनी शेतातील गहू व ट्रॅक्टरची अवजारेही चोरून नेली. चार पैसे मिळतील म्हणून साठवणूक केलेला कांदा चोरीला गेला, अशा शब्दांत निमसे यांनी ‘लोकमत’कडे भावना व्यक्त केल्या़ चोरीची घटना सांगताना त्यांच्या डोळ्यांच्या कडा ओलावल्या होत्या. कर्ज काढून बांधलेल्या चाळीमधील कांदा चोरीला गेल्याने त्याचे कर्ज फेडायचे कसे, असा प्रश्न त्यांना पडला आहे. काही दिवसांपूर्वीच काळे आखाडा येथून बाळासाहेब रासने यांचा पाच हजार क्विंटल कांदा चोरीस गेला होता़ त्याबाबत त्यांनी पोलिसात फिर्याद नोंदविली आहे. मात्र, त्या चोरीचा अजून तपास लागलेला नसताना पुन्हा कांदा चोरीची घटना घडली आहे. सोलापूर : येथील कृषी उत्पन्न बाजार समितीच्या इतिहासात प्रथमच कांद्याला प्रति क्विंटल ७ हजार ४०० रुपये एवढा विक्रमी दर मिळाला. शुक्रवारी बाजार समितीमध्ये केवळ १३ ट्रक कांद्याची आवक झाली.सोलापूर मार्केटमध्ये गेल्या आठवड्यापासून कांद्याची आवक कमी झाली आहे. १७ आॅगस्टला येथे प्रति क्विंटल ५ हजार ३५० रुपये दर मिळाला़ त्यानंतर सातत्याने भाव वाढत आहेत. सोलापूर कृषी उत्पन्न बाजार समितीमध्ये शुक्रवारी कांद्याला ७ हजार ४०० रुपये दर मिळाला. त्याचा सर्वाधिक फायदा शेतकऱ्यांपेक्षा व्यापाऱ्यांना होईल. कारण बाजारात अजून नवीन कांदा आलेला नाही़ गेल्या वर्षी आंध्रातील व्यापाऱ्यांनी शेतकऱ्यांकडून कमी दरात घेतलेला कांदा ते आता बाजारात आणत आहेत़, अशी माहिती बाजार समितीचे सभापती दिलीप माने यांनी दिली.(प्रतिनिधी)
अहमदनगरमध्ये शेतातील एक लाखाचा कांदा चोरीला!
By admin | Updated: August 22, 2015 00:57 IST