पाटण : ‘इंग्रजांच्या काळात १७० किलोमीटरची जलवाहिनी टाकून मुंबईला पाणीपुरवठा केला होता. तर मग कोयना धरणातील पाणी मुंबईला का जाऊ शकत नाही? त्यासाठी भविष्यात पाठपुरावा करून कोयनेचे पाणी मुंबईला नेणार आहे,’ अशी माहिती गृहनिर्माण, उच्च शिक्षण व तंत्रज्ञान राज्यमंत्री तसेच रत्नागिरीचे पालकमंत्री रवींद्र वायकर यांनी दिली.दौलतनगर,मरळी, ता. पाटण येथे आयोजित पत्रकार परिषदेत ते बोलत होते.वायकर म्हणाले, ‘कोयना धरणातील पाण्यावर वीजनिर्मिती करून उरलेले पाणी नदीत सोडले जाते. हे पाणी वाया जात आहे. दुसरीकडे चिपळूणमधील अनेक गावे पाण्यापासून वंचित आहेत. अशा गावांना कोयनेच्या पाण्याचा लाभ देण्याचा प्रयत्न करणार आहे. विद्यार्थ्यांच्या पाठीवरील दप्तराचे ओझे कमी करण्याचा प्रयत्न करणार आहे. प्राध्यापकांची संख्या कमी पडत आहे. तासिका धर्तीवर अनेकजण कमी पगारात काम करत आहेत. राज्यातील औद्योगिक वसाहतीत अनेक यंत्रणा पडून आहेत. बाजारात कुशल कामगारांचा पुरेसा संख्याबळ असताना अशा यंत्रणा व गुंतवणुकीचा प्रत्यक्ष वापर झाला पाहिजे.’ ‘महिलांना पन्नास टक्के राखीव जागा असल्याच पाहिजेत, हे शिवसेनेचे धोरण आहे. प्राथमिक शिक्षण विभाग माझ्या ताब्यात नसला तरी वीस पटांखालील शाळा बंद करणे, शिक्षणाचा अधिकार कायद्यानुसार कोणत्याही शिक्षकावर अन्याय होणार नाही, यासाठी शिक्षणमंत्री विनोद तावडे व प्राथमिक शिक्षण विभागाचे सचिव यांच्याशी चर्चा करणार आहे.’ (प्रतिनिधी)
कोयनेचे पाणी मुंबईला नेणार : वायकर
By admin | Updated: February 2, 2015 23:56 IST