कोल्हापूर : चित्रपटसृष्टीची बीजे कोल्हापूरच्या मातीत रुजली, या घटनेला तीन वर्षांनी शंभर वर्षे पूर्ण होत आहेत. तत्पूर्वी कोल्हापूरकरांचे स्वप्न असलेली कोल्हापूर चित्रनगरी दिमाखात उभी राहील आणि देशभरातील चित्रपट व्यावसायिक येथे चित्रपट निर्माण करण्यासाठी येतील, असा शब्द कोल्हापूरचे पालकमंत्री चंद्रकांतदादा पाटील यांनी दिला. यावेळी त्यांनी २५ वृद्ध कलाकारांना एक वर्षासाठी त्यांच्यावतीने एक हजार रुपये मानधन जाहीर केले. अखिल भारतीय मराठी चित्रपट महामंडळाच्या वतीने दिग्दर्शक अनंत माने यांच्या जन्मशताब्दी वर्षानिमित्त आयोजित अनंत माने स्मृती चित्रपट महोत्सवाच्या समारोपाप्रसंगी प्रमुख पाहुणे म्हणून ते बोलत होते. व्यासपीठावर महाराष्ट्र सांस्कृतिक रंगभूमी, साहित्य, चित्रपट विकास महामंडळाचे व्यवस्थापकीय संचालक विलास पाटील, महामंडळाचे अध्यक्ष विजय पाटकर, दिग्दर्शक यशवंत भालकर, चंद्रकांत जोशी, सुभाष भुरके, उपस्थित होते. यावेळी चित्रपट महामंडळातर्फे २२ वृद्ध कलाकारांसाठी मानधन योजनेचा प्रारंभ केला. चंद्रकांतदादा पाटील म्हणाले, कोल्हापूर चित्रनगरी पूर्ण होण्यात तांत्रिक अडचण नाही, निधीची कमतरता नाही. येत्या १५ दिवसांत सांस्कृतिक कार्यमंत्री विनोद तावडे यांच्याशी बैठक घेऊन चित्रनगरीचे काम कुठे अडकले आहे यावर सविस्तर चर्चा केल्यानंतर पुनरुज्जीवनाचा कालावधी सांगता येईल; पण कोल्हापूरवासीयांच्या इच्छेप्रमाणे तीन वर्षांच्या आत सुसज्ज चित्रनगरी उभी राहिलेली असेल. वृद्ध कलाकारांना शासनातर्फे दिले जाणारे मानधन १९९८ पासून का रखडले आहे, याचीही चौकशी केली जाईल. महामंडळातर्फे दिले जाणारे मानधन अत्यल्प असल्याने त्यात एक वर्षासाठी माझ्यावतीने प्रत्येकी एक हजार रुपयांची भर घालून २५ वृद्ध कलावंतांना दरमहा प्रत्येकी दीड हजार मानधन देण्यात येईल, अशी घोषणाही त्यांनी केली. पाटकर यांनी चित्रनगरीसाठी कुदळ, फावडे पाट्या घेऊन राबायला तयार आहोत. इतक्या वर्षांत चित्रपट महामंडळाचा एकही आजी-माजी अध्यक्ष नसेल, ज्याने चित्रनगरीसाठी पाठपुरावा केलेला नाही; मात्र अद्याप त्याला यश आलेले नाही. आता तरी शासनाने ही बाब मनावर घ्यावी, असे आवाहन केले. सुभाष भुरके यांनी प्रास्ताविक केले. ऐश्वर्या बेहरे यांनी सूत्रसंचालन केले. मिलिंद अष्टेकर यांनी आभार मानले. (प्रतिनिधी)अनंत माने स्मृती पुरस्काराची घोषणाएक लाख रुपये : कुटुंबीयांच्यावतीने प्रतिष्ठानची स्थापना कोल्हापूर : मराठी चित्रपटसृष्टीत मैलाचा दगड ठरलेल्या चित्रपटांचे दिग्दर्शन, चित्रपट महामंडळाच्या आणि चित्रनगरीच्या स्थापनेत अनंत माने यांनी पुढाकार घेतला होता. त्यांच्या या योगदानाच्या स्मृती चिरंतन राहाव्यात यासाठी महाराष्ट्र सांस्कृतिक रंगभूमी, साहित्य, चित्रपट विकास महामंडळाचे व्यवस्थापकीय संचालक विलास पाटील यांनी अनंत माने कुटुंबीयांच्या वतीने ‘अनंत माने प्रतिष्ठान’ची स्थापना करण्यात येणार असल्याची घोषणा केली. याअंतर्गत चित्रपटसृष्टीत मोलाचे योगदान दिलेल्या व्यक्तीला एक लाख रुपयांचा ‘अनंत माने स्मृती पुरस्कार’ देण्यात येणार आहे. या पुरस्काराच्या घोषणेने ‘लोकमत’च्या पाठपुराव्याला यश आले आहे. अखिल भारतीय मराठी चित्रपट महामंडळातर्फे माने यांच्या जन्मशताब्दीनिमित्त आयोजित ‘अनंत माने स्मृती चित्रपट महोत्सवा’च्या समारोपप्रसंगी विलास पाटील यांनी ही घोषणा केली. ‘लोकमत’च्या पाठपुराव्याला यश मराठी चित्रपटसृष्टीत एवढे मोलाचे योगदान देणारे अनंत माने यांचा जणू या सृष्टीला विसरच पडला होता. त्यामुळेच त्यांच्या जन्मशताब्दी वर्षाचेही स्मरण यंत्रणेला झाले नाही. मात्र ‘लोकमत’मध्ये सलग आठ दिवस त्यांच्या कारकिर्दीवर आधारित विशेषांक, लेख प्रसिद्ध झाले. त्याला वाचकांकडून भरभरून प्रतिसादही मिळाला. कोल्हापुरातील चित्रपट व्यावसायिकांनी त्याची दखल घेतली. माने यांचे स्मारक उभारण्याचा निर्णय घेतला. अखेर अखिल भारतीय मराठी चित्रपट महामंडळाने अनंत माने जन्मशताब्दीनिमित्त चित्रपट महोत्सव आयोजित करण्याचा निर्णय जाहीर केला. आता त्यांच्या नावे दिल्या जाणाऱ्या पुरस्काराच्या घोषणेने ‘लोकमत’च्या पाठपुराव्याला यश आल्याची प्रतिक्रिया महामंडळाच्या पदाधिकाऱ्यांनी व दिग्दर्शकांनी दिली.
कोल्हापुरात चित्रनगरी तीन वर्षांत उभारणार
By admin | Updated: September 4, 2015 00:41 IST