नम्रता फडणीस, पुणेकोकणात साहित्य पर्यटनाचे नवे बीज अंकुरू लागले असताना त्याच्या वृद्धिंगतेला आता ‘पुस्तकांचं गाव’ या संकल्पनेचा आधार मिळणार आहे. राज्य सांस्कृतिक विभाग व मराठी भाषा विभागातर्फे आद्यकवी केशवसुत यांचे मालगुंड हे जन्मगाव ‘पुस्तकांचं गाव’ म्हणून विकसित केले जाणार आहे. याबाबत कोकण मराठी साहित्य परिषदेकडे (कोमसाप) समन्वयाची जवाबदारी सोपविण्यात आली आहे.घुमान येथील ८८व्या अखिल भारतीय मराठी साहित्य संमेलनात सांस्कृतिक मंत्री विनोद तावडे यांनी ‘पुस्तकांचं गाव’ संकल्पना मांडली होती. वाचकांपर्यंत दर्जेदार मराठी साहित्य पोहोचावे तसेच वाचन संस्कृती वृद्धिंगत व्हावी, हा त्यामागील उद्देश होता. रत्नागिरी जिल्ह्यातील मालगुंड येथून ही संकल्पना प्रत्यक्षात येत असल्याची माहिती कोकण मराठी साहित्य परिषदेचे प्रमुख कार्यवाह प्रशांत परांजपे यांनी ‘लोकमत’शी बोलताना दिली. परांजपे म्हणाले, की केशवसुत यांच्या मालगुंड या जन्मगावी त्यांच्या घराचेच स्मारक बनवण्यात आले आहे. केशवसुत स्मारक परिषद त्याचे काम पाहते. त्यात त्यांच्या कवितांचे शिलालेख, प्रशस्त ग्रंथालय, सभागृह, साहित्यिक - कवींची विविध दालने आहेत. गेल्या वर्षी शासनाने त्यासाठी दीड कोटींचा निधी दिला. कोकणात साहित्य पर्यटन विकसित करण्यासाठी कोमसापतर्फे राबविल्या जाणाऱ्या उपक्रमांची दखल घेत मालगुंडमध्ये ‘पुस्तकांचं गाव’ विकसित करण्याबाबत शासनाकडून विचारणा झाली. उपक्रमाचे टप्पे आणि निधीविषयी प्राथमिक चर्चा झाली असून, नियोजनासाठी २१ जूनला मंत्रालयात बैठक होणार असल्याचेही त्यांनी सांगितले.
केशवसुतांच्या जन्मगावी साकारतंय ‘पुस्तकांचं गाव’!
By admin | Updated: June 3, 2015 01:33 IST