९८५ जोडप्यांचा विवाह : २५ हजार २४७ नागरिकांना मेळाव्यातून मिळाली प्रमाणपत्रेगडचिरोली : जिल्ह्यातील नागरिकांच्या विविध समस्या सोडविण्यासाठी गडचिरोली पोलिसांनी आयोजित आतापर्यंत ४०७ जनजागरण मेळावे घेतले. त्यात सामूहिक विवाह योजनेंतर्गत एकूण ९८५ जोडप्यांचे शुभमंगल झाले. सन २०१३ या वर्षात सर्वाधिक २०१ जनजागरण मेळावे घेऊन २५ हजार २४७ नागरिकांना विविध प्रमाणपत्रांचे वितरण करून त्यांच्या विविध समस्यांचे निराकरण करण्यात आले. गडचिरोली पोलिसांतर्फे जनजागरण मेळावा हा एक प्रभावी कार्यक्रम राबविण्यात येत आहे. या मेळाव्यात प्रशासकीय विभाग सहभागी होतात व नागरिकांना संबंधित विभागाकडील शासकीय योजनांबाबतच्या माहितीचे मार्गदर्शन करण्यात येते. या मेळाव्यात संबंधित विभागाकडून वेगवेगळी प्रमाणपत्रं, जमिनीचे सातबारा वितरण, आर्थिक मदतीचे वाटप, क्रीडा स्पर्धा घेऊन बक्षीस वितरण, सामूहिक विवाह, आरोग्य तपासणी, सांस्कृतिक कार्यक्रम घेण्यात येतात. सन २००५ ते ३१ मार्च २०१४ पर्यंत एकूण ४०७ जनजागरण मेळावे घेण्यात आले. यात सामूहिक विवाह योजनेतून एकूण ९८५ जोडप्यांचे विवाह करण्यात आले. ७ हजार ४८ नागरिकांची आरोग्य तपासणी करण्यात आली. विविध गावांमध्ये ११५ नवीन विद्युत लाइन जोडण्यात आल्या. २२५ नागरिकांना नवीन वाहन शिकाऊ परवाने देण्यात आले. बी-बियाण्यांचे वाटप करण्यात आले. तसेच विविध योजनांचे १ हजार ३१२ अर्ज वितरीत करण्यात आले.
नक्षलग्रस्त गडचिरोलीत जनजागरण मेळावे
By admin | Updated: June 22, 2014 00:53 IST