पुणे : आधुनिक युगात युद्धाचे स्वरूप बदलले आहे. संपूर्ण जगाला आज दहशतवादाचा धोका आहे. या परिस्थितीत जागतिक शांतता टिकविण्याच्या प्रक्रियेत भारताची भूमिका अत्यंत महत्त्वाची आहे, असे प्रतिपादन मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी शुक्रवारी केले. राष्ट्रीय संरक्षण प्रबोधिनीत (एनडीए) १२९व्या तुकडीच्या पदवीप्रदान समारंभात प्रमुख पाहुणे म्हणून ते बोलत होते. याप्रसंगी एनडीएचे कमांडंट जी. अशोक कुमार, प्राचार्य ओमप्रकाश शुक्ला, डेप्युटी कमांडंट एस.के. राव उपस्थित होते. या वेळी बी.ए., बी.एस्सी., बी. एस्सी. कॉम्प्युटर या शाखांच्या ३३३ विद्यार्थ्यांना जवाहरलाल नेहरू विद्यापीठाची पदवी बहाल करण्यात आली.बीए शाखेतील अभिषेक कुंडलिया या विद्यार्थ्याने प्रथम क्रमांक पटकावला, तसेच त्याला चीफ आॅफ एअर स्टाफच्या रौप्यपदकाने, विज्ञान शाखेतून प्रथम आलेल्या राकेश काद्यान याला चीफ आॅफ आर्मी स्टाफच्या रौप्यपदकाने, तर जितेंद्र कुमार याला चीफ आॅफ नेव्हल स्टाफच्या रौप्यपदकाने गौरविण्यात आले. जितेंद्र कुमारने तिन्ही विभागांतील विद्यार्थ्यांमध्ये सर्वोत्कृष्ट कामगिरी करून नौदलचषक पटकावला. आजोबा आणि वडील सैन्यात असल्याने लष्करात दाखल होण्याची प्रेरणा मिळाली. एनडीएच्या तिन्ही शाखांतून प्रथम येणे ही गौरवाची बाब आहे. एनडीएतील दिनक्रम कसोटी पाहणारा होता. मिलिटरी इंटेलिजन्समध्ये काम करण्याची इच्छा आहे. - जितेंद्र कुमार, बेस्ट स्टुडंट
जागतिक शांततेत भारताची भूमिका अत्यंत महत्त्वाची
By admin | Updated: November 28, 2015 02:05 IST