सांगली : राज्यातील पतसंस्थांची चळवळ सशक्त करण्यासाठी लवकरच स्वतंत्र मंडळ स्थापन करण्यात येईल. सहकार कायद्यात पतसंस्थांसाठीचा स्वतंत्र भाग तयार करण्यात येणार आहे, अशी माहिती सहकारमंत्री चंद्रकांत पाटील यांनी सांगलीत पत्रकार परिषदेत दिली. ते म्हणाले की, ‘राज्यात दोन लाख ३० हजार सहकारी संस्था आहेत. किमान लाखभर संस्था बोगस असल्याचा संशय होता. ‘फिजिकल आॅडिट’मध्ये ७० हजार संस्था बोगस निघाल्या. या संस्था बंद करून उर्वरित संस्थांवर लक्ष केंद्रित करण्याचे धोरण सहकार विभागाचे आहे. पतसंस्थांच्या सक्षमीकरणासाठीही ५० हजारां-पर्यंतच्या ठेवींना विमा संरक्षण देण्याचा विचार आहे. याशिवाय सहकार कायद्यात पतसंस्थेसाठी स्वतंत्र भाग तयार करण्यात येईल. एलबीटी माफी, टोल बायबॅक आणि दुष्काळी मदतींमुळे तिजोरीवर ताण पडला असला, तरी चिंता नाही. ३१ मार्चपर्यंत पडणारा बोजा कमी करण्याच्या दृष्टीने शासनाचे नियोजन आहे, असे ते म्हणाले. (प्रतिनिधी)
पतसंस्थांसाठी राज्यात लवकरच स्वतंत्र मंडळ
By admin | Updated: November 11, 2015 02:40 IST