प्राची सोनवणे,
नवी मुंबई- पवित्र महिना म्हणून ओळखल्या जाणाऱ्या रमजाननिमित्त बाजारात सुक्या मेव्याला वाढती मागणी आहे. महिनाभर रोजा असल्याने खजूर, काजू, बदाम असा सुका मेवा तसेच फळांना मोठ्या प्रमाणात मागणी आहे. रमजानच्या महिन्यात सूर्याेदयापासून ते सूर्यास्तापर्यंत पाण्याचा एक थेंबही न घेता कडक उपवास पाळला जातो. उपवासानंतर शरीराला आवश्यक ऊर्जा मिळावी याकरिता सुका मेवा, फळे, रबडी, खजूर आदी पदार्थ खाल्ले जातात. एपीएमसी बाजारपेठेत सुका मेवा तसेच फळांची मागणी वाढली आहे. दिवसाला १३७ ट्रक आणि ५१ टेम्पो सुक्या मेव्याची आवक झाली, तर ३२७ वाहने फळांची आवक झाली आहे. सुक्या मेव्याच्या दरांमध्ये १० ते २० रुपये वाढ झाल्याचे दिसून येते. किरकोळ बाजारात काजू १००० ते १७०० रुपये, बदाम ७०० ते १००० रुपये, पिस्ता १००० ते १८००रुपये, अंजीर ६०० ते ९०० रुपये, अक्रोड १२०० ते १८०० रुपये, खजूर ७०० ते १८०० रुपये दराने उपलब्ध आहेत. सौदी अरेबिया, तुर्की, इजिप्त, इराक, इराण या देशांमधील खजूर बाजारात दाखल झाला आहे. या विदेशी खजुरांनाही मोठ्या प्रमाणात मागणी असल्याचे दिसून येते.फळ बाजारही फुल्लइफ्तार पार्टीसाठी फळांची मागणी वाढली आहे. डाळींब, कलिंगड, खरबूज, ओल्या खजुराच्या खरेदीसाठी बाजारपेठेत मोठ्या प्रमाणात गर्दी झाली असून डाळींब ६० ते ९० रुपये किलो, कलिंगड २० ते ५० रुपये, ओले खजूर ५० ते ८० रुपये किलो दराने उपलब्ध आहे.