मुंबई : मुंबई महानगर क्षेत्रात परवडणारी घरे उभारणीसाठी शिवशाही पुनर्वसन प्रकल्प (एसपीपीएल) कंपनीने जमीन मालक, विकासकांकडून निविदा मागविल्या होत्या. त्याला ७५ जणांनी प्रतिसाद दिल्याने एसपीपीएलने निविदा सादर करण्याची मुदत १५ सप्टेंबरपर्यंत वाढविली आहे. २0२२पर्यंत सर्वांना घर देण्याचा निर्धार केंद्र शासनाने केला आहे. त्यानुसार राज्यातील विविध प्राधिकरणांमार्फत गृह उभारणीसाठी प्रयत्न सुरू आहेत. गेल्या १० वर्षांपासून गृह उभारणीचे बंद पडलेले काम पुन्हा सुरू करण्यासाठी एसपीपीएलने प्रयत्न सुरू केले आहेत. १० वर्षांपूर्वी एसपीपीएलने विविध ठिकाणी १० प्रकल्प राबवून १0 हजार ६७२ घरे बांधली होती. एसपीपीएलला शासनाकडून निधी मिळाल्याने प्रकल्पाने खासगी जमीन मालक आणि विकासकांकडून परवडणारी घरे उभारण्यासाठी निविदा मागविल्या आहेत. एसपीपीएलसोबत संयुक्तरीत्या गृहबांधणी प्रकल्प राबवून मुंबई महानगर क्षेत्रात परवडणारी घरे उपलब्ध करून द्यावीत, त्याबदल्यात विकासकांना काय मोबदला हवा, याबाबत एसपीपीएलने १५ जुलैला संबंधितांकडून निविदा मागविल्या होत्या. या जाहिरातीला ७५ विकासकांनी प्रतिसाद दिला. विकासकांनी रस दाखविल्याने कंपनीचे बंद पडलेले काम आता विकासकांमार्फत पुन्हा सुरू होण्याचा मार्ग मोकळा झाला आहे.
शिवशाहीसोबतच्या गृह प्रकल्पाची मुदत वाढवली
By admin | Updated: August 23, 2015 00:15 IST