उरण : मागील पंधरा दिवसांपासून सातत्याने बरसणाऱ्या पावसामुळे उरण शहर, ग्रामीण आणि औद्योगिक भागाला पाणीपुरवठा करणाऱ्या रानसई, पुनाडे धरण क्षेत्रात समाधानकारक पाऊस पडला आहे. पाऊस पडण्याची स्थिती अशीच राहिली तर रानसई धरण जुलै महिन्याच्या अखेरीपर्यंत ओसंडून वाहू लागेल, असा विश्वास एमआयडीसीचे कनिष्ठ अभियंता रणजित काळेबाग यांनी व्यक्त केला.उरण शहर, ग्रामीण भागातील ३५ गावे आणि परिसरातील औद्योगिक क्षेत्राला रानसई धरणातून पाणीपुरवठा केला जातो. ११६ फूट उंचीच्या धरणात सध्या १०० फूट ९ इंच पाणी जमा झाले आहे. रानसई धरणात ४९७ मि.मी. पाऊस पडला आहे. पाऊस पडण्याचे प्रमाण जून प्रमाणे राहिल्यास रानसई धरण जुलै महिन्याच्या अखेरीपर्यंत ओव्हरफ्लो होईल, असा विश्वास एमआयडीसीचे कनिष्ठ अभियंता रणजित काळेबाग यांनी व्यक्त केला. उरण पूर्व भागातील पुनाडे, वशेणी, पिरकोन आदि १० गावांना पाणीपुरवठा करणाऱ्या पुनाडे धरण क्षेत्रातही समाधानक ारक पाऊस पडला आहे. तर चिरनेर येथील आक्कादेवीच्या डोंगरात असलेले छोटेखानी आक्कादेवी धरणही कालपासून ओसंडून वाहू लागले आहे. या धरणात पोहण्याचा आणि वर्षा सहलीचा आनंद लुटण्यासाठी पर्यटक, निसर्गप्रेमींची पावसाळ्यात नेहमीच गर्दी असते. उरण परिसरात धरण क्षेत्रात समाधानकारक पाऊस पडल्याने नागरिकांमध्ये आनंदाचे वातावरण आहे. (वार्ताहर)
धरणांच्या पातळीत वाढ
By admin | Updated: July 4, 2016 02:56 IST