कोल्हापूर : मुख्यमंत्री झाल्यावर मी छत्रपती शिवरायांच्या विचारानेच काम करण्याचा संकल्प केला आहे. मी त्यांचा सेवक आहे. संभाजीराजे यांची खासदारपदी निवड व्हावी म्हणून पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्याकडे मी त्याच भूमिकेतून केवळ लखोटा घेऊन जाण्याचे काम केले, असा टोला मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी राष्ट्रवादीचे नेते खासदार शरद पवार यांना लगावला.कोल्हापूर दौऱ्यावर आलेल्या शरद पवार यांनी शनिवारी ‘न्यू पॅलेस’ या राजवाड्यावर जाऊन छत्रपतीचे वारस असलेल्या परिवारासोबत स्रेहभोजन घेतले. त्यानंतर पत्रकारांशी बोलताना त्यांनी संभाजीराजे यांच्या राज्यसभेवरील नियुक्तीवर अत्यंत खोचक प्रतिक्रिया दिली होती. ते म्हणाले की, ‘इतिहास पाहिला तर असे दिसते की पूर्वी छत्रपती हे पेशव्यांची नियुक्ती करायचे. हे पेशवे फडणवीस नेमत असत, परंतु आता महाराष्ट्राच्या राजकारणात उलटे झाले आहे. इथे तर फडणवींसांनीच छत्रपतींची नियुक्ती केली आहे!’ पवार यांच्या या वक्तव्यावर सोशल मीडियात बरीच उलट-सुलट प्रतिक्रिया उमटली. काहींना पवारांचे हे विधान जातीयवादी वाटले, तर काहींनी त्यांच्या समयसूचकतेला दाद दिली. मात्र, पवार यांच्या वक्तव्यातील खरी खोच लक्षात घेऊन मुख्यमंत्र्यांनी त्यांना कागल येथे रविवारी झालेल्या कार्यक्रमात प्रत्युत्तर दिले. ते म्हणाले, पंतप्रधान आणि राष्ट्रपती यांनी शाहूंच्या विचारांचा सन्मान म्हणून संभाजीराजेंची नियुक्ती केली आहे. त्यात माझी भूमिका केवळ लखोटा घेऊन जाण्यापुरतीच होती. ‘जाणता राजा’ कसं म्हणायचं?-तावडेशाहूंच्या विचारांचे कार्य आणि वारसा लक्षात घेऊन पंतप्रधानांच्या शिफारशीवरून राष्ट्रपतींनी संभाजीराजेंना खासदार म्हणून नियुक्त केले, असा कृतज्ञापूर्वक उल्लेख शाहू महाराजांनी येथे रविवारी एका कार्यक्रमात केला. तोच संदर्भ देत शिक्षणमंत्री विनोद तावडे म्हणाले, हाच मुद्दा काल (शनिवारी) दुपारी तुमच्या वाड्यावर जेवायला आलेल्या पाहुण्यांना (शरद पवार) सांगितला असता, तर संध्याकाळी त्यांच्याकडून नको ती टीका झाली नसती. पूर्वी छत्रपतींच्या काळात जावळीच्या मोऱ्यांना, डफळ्यांना आणि सुप्याच्या मोहित्यांना छत्रपतींचं कधी चांगलं दिसलंच नाही. त्याचीच पुनरावृत्ती काल येथे झाली. मोदी सरकारनं दिल्लीच्या तख्तावर सन्मानानं संभाजीराजेंची राष्ट्रपतींकडून नियुक्ती केली. या गोष्टीकडे राजकारणाच्या पलीकडे जाऊन पाहायला पाहिजे होते. परंतु त्यांना चांगलं काही दिसलंच नसल्याची टीका केली. मग यांना जाणता राजा कसं म्हणायचं, असा सवाल केला. (प्रतिनिधी)>कार्यकर्त्यांना अटकमराठा आरक्षणासाठी फडणवीस यांच्यासमोर निदर्शने करण्याच्या प्रयत्नात असणाऱ्या स्वाभिमान संघटनेच्या २५ कार्यकर्त्यांना पोलिसांनी ताब्यात घेतले. फडणवीस रविवारी कोल्हापूर दौऱ्यावर होते. त्यांचा ताफा अडवून आरक्षणासाठी निदर्शने करण्यासाठी स्वाभिमान संघटनेचे २५पेक्षा जास्त कार्यकर्ते सावित्रीबाई फुले रुग्णालयासमोर जमले होते. मात्र, पोलिसांनी त्यांना वेळीच ताब्यात घेतल्याने त्यांचे आंदोलन बारगळले.
मी तर छत्रपतींचा सेवक - मुख्यमंत्री
By admin | Updated: June 27, 2016 05:19 IST