गडचिरोली : पोलिसांचा वाढता दबाव व नक्षल चळवळीत होणारी गळचेपी पाहून गेल्या काही वर्षांत शंभराहून अधिक नक्षलवाद्यांनी पोलिसांपुढे आत्मसमर्पण केले आहे. दीडशे आत्मसमर्पित नक्षलवाद्यांना प्रत्येकी १ लाख रूपयांचे घरकुल बांधून देण्यात येणार आहे. यासाठी मुरखळा (नवेगाव ) येथील ६ हेक्टर जमीन अधिग्रहीत करण्यात आल्याची माहिती पोलीस अधीक्षक सुवेझ हक यांनी मंगळवारी दिली. २०१४ मध्ये १५ नक्षलवाद्यांनी आत्मसमर्पण केले आहे. यात दलम कमांडर १, डेप्युटी कमांडर २, साधे कमांडर ११ व एका डीसीए दलम कमांडराचा समावेश आहे. आत्मसमर्पण केलेल्या १०८ नक्षलवाद्यांना आधार कार्ड मिळाले असून, ४८ आत्मसमर्पित नक्षलवाद्यांना मतदान ओळखपत्र देण्यात आले आहे. नुकत्याच झालेल्या लोकसभा निवडणुकीत ५० आत्मसमर्पितांनी मतदान केल्याचेही हक यांनी सांगितले. १५ आत्मसमर्पित नक्षलवाद्यांवर शस्त्रक्रिया करून त्यांची नसबंदी खुली करण्यात आली. आत्मसमर्पितांना अन्न सुरक्षा योजनेचा लाभ देण्यात येत असून, त्यांना केशरी कार्डसुध्दा मिळणार आहे. आत्मसमर्पित नक्षल्यांना चांगले जीवन व्यतित करण्यासाठी शासन व पोलीस विभाग कटीबध्द आहे. असेही सुवेझ हक यावेळी म्हणाले. (प्रतिनिधी)
दीडशे आत्मसमर्पितांना मिळणार हक्काचे घर!
By admin | Updated: June 18, 2014 05:03 IST