अहमदनगर : केंद्र व राज्य सरकारच्या पर्यटन विकास योजनेतून आदर्शगाव हिवरेबाजार येथे उभारण्यात आलेल्या आणि शास्रशुद्ध माहिती देणाऱ्या राज्यातील पहिल्या ग्रामीण पर्यटन केंद्राचे १ जून रोजी राज्यपाल सी. विद्यासागर राव यांच्या हस्ते उद्घाटन होत आहे़ या केंद्रात हिवरेबाजार येथे गेल्या तीन दशकात केलेल्या उपक्रमांची व नावीन्यपूर्ण कामांची माहिती विविध भाषेत पर्यटकांना मिळणार आहे. यात स्लाईड शो व संवाद केंद्राचाही समावेश आहे.हिवरेबाजारने सुरुवातीपासून गावात लोकसहभागातून कशा पद्धतीने कायापालट करून दुष्काळावर मात केली आहे, येथील पाण्याचा ताळेबंद तसेच जलसंधारणचे महत्वाकांक्षी काम, श्रमदानातून केलेली कामे आदींबाबत माहिती घेण्यासाठी देशभरातून हजारो अभ्यासक व पर्यटक हिवरेबाजारला भेट देत असतात. केंद्र व राज्य सरकारने येथे ग्रामीण पर्यटन केंद्र सुरु केले आहे. (तालुका प्रतिनिधी)>नाश्ता अन् दुपारचे जेवण राजभवनातच जिल्ह्यातील ‘जलयुक्त’ची कामे करणाऱ्या २७९ गावांतील सरपंचांना १ जून रोजी हिवरेबाजार येथे दुष्काळस्थितीवर चर्चासत्रासाठी आमंत्रित करण्यात आले आहे. राज्यात दुष्काळ असल्याने या दौऱ्यात राज्यपाल सकाळचा नाश्ता राजभवनात घेणार असून हिवरेबाजारची भेट संपल्यानतर दुपारच्या जेवणासाठी परत राजभवन येथे जाणार आहेत.
हिवरेबाजारला ग्रामीण पर्यटन केंद्र
By admin | Updated: May 30, 2016 04:40 IST