मुंबई : आघाडी सरकारने १ एप्रिल २०१४ रोजी केलेली मानधनवाढ देण्यास युती सरकारने नकार दिल्याने अंगणवाडी कर्मचाऱ्यांच्या विविध संघटनांनी एकत्र येत तीव्र आंदोलनाचा पवित्रा घेतला आहे. राज्यभर सुमारे २ लाखांहून अधिक अंगणवाडी सेविका, मदतनीस आणि मिनी अंगणवाडी सेविका असून, थकीत वाढीव मानधनासाठी १८ मार्चला मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या नागपूर येथील निवासस्थानाबाहेर सर्व कर्मचारी धरणे आंदोलन करणार आहेत. गुरुवारी सर्व संघटनांनी एकत्र येऊन कृती समितीच्या बैठकीत हा निर्णय घेतला आहे.याबाबत आयटकचे राज्य सचिव दिलीप उटाणे यांनी सांगितले की, २०१४ साली सर्व संघटनांनी एकजूट करत दोन महिन्यांचा संप यशस्वीरीत्या पार पाडला होता. त्यानंतर काढलेल्या महामोर्चानंतर सरकारने धोरणात्मक निर्णय घेत अंगणवाडी सेविकांच्या मानधनात ९५० रुपये, तर मदतनिसांच्या मानधनात ५०० आणि मिनी अंगणवाडी सेविकांच्या मानधनात ४५० रुपयांची तुटपुंजी वाढ केली होती. १ एप्रिल २०१४ पासून ही मानधनवाढ मिळणे अपेक्षित होते. मात्र गेल्या वर्षभरापासून मंजूर झालेली मानधनवाढ कर्मचाऱ्यांना मिळालेली नाही. याउलट आघाडी सरकारने आर्थिक तरतूद केली नसल्याने वर्षभरातील मानधनवाढ देण्यास युती सरकारने नकार दिला आहे. मानधनवाढीचे श्रेय लाटण्यासाठी १ एप्रिल २०१५ पासून मानधनवाढ देऊ, असे हास्यास्पद आश्वासन सरकार देत असल्याचे उटाणे यांनी सांगितले.परिणामी, आक्रमक झालेल्या संघटनांनी पुन्हा एकदा एकत्र येण्याचा निर्णय घेतला आहे. आजसर्व संघटनांनी एकत्र येत कृती समितीची बैठक घेत तीव्र आंदोलनाची आखणी केली आहे. (प्रतिनिधी)
मुख्यमंत्र्यांना घेराव घालण्याचा इशारा
By admin | Updated: March 13, 2015 05:35 IST