ठाणे : बेकायदेशीर दगड उत्खनन करणाऱ्या ८२ दगडखाणी सील करण्याची कारवाई ठाणे जिल्हाधिकारी अश्विनी जोशी यांनी सुरू केली असून, यात सर्वाधिक दगडखाणी नवी मुंबई परिसरातील आहेत. दगडखाणमालकांकडून १४ कोटी रुपये दंडासह रॉयल्टी वसूल करण्यात आली. दरम्यान पाच दगडखाणी सील करून साडेसहा कोटींचा दंड वसूल केला आहे.खाणपट्टा आदेशातील अटी व शर्तींचा नवी मुंबईतील तुर्भे परिसरातील पाच खाणींनी भंग केल्याचे आढळल्याने गेल्या आठवाड्यात त्या सील करण्यात आल्या. आता आणखी सहा दगडखाणी बंद करण्याच्या जोरदार हालचाली जिल्हाधिकारी कार्यालयाने सुरू केल्या आहेत. याशिवाय, उर्वरित ६१ दगडखाणींचे सर्वेक्षण हाती घेतले आहे. या सर्वेक्षणाद्वारे खात्री करून घेतल्यानंतरच त्यांच्यावर दंडात्मक कारवाई केली जाणार आहे.खाणपट्टेधारकांना धक्का - बेकायदेशीर दगड उत्खनन करणाऱ्या या ८२ खाणींच्या मालकांकडून स्वामित्वधनापोटी सुमारे १४ कोटी वसुली करण्याची कारवाई सुरू करण्यात आली आहे. - आतापर्यंत ६ कोटी ५० लाखांची रक्कम वसूल झाली आहे. टोटल स्टेशन मशीनद्वारे खाणींमधून नक्की किती उपसा होतो, हे अचूकरीत्या कळत असल्यामुळे खाणपट्टेधारकांना चांगलाच धक्का बसला आहे. मालक धास्तावले : जिल्ह्यातील १४३पैकी ८२ दगडखाणी अनधिकृत व बेसुमार दगड उत्खनन करणाऱ्या असल्याचे उघड झाले आहे. यात नवी मुंबई परिसरातील खाणींचा सर्वाधिक समावेश आहे. या कारवाईपूर्वी कोल्हापूरच्या उपसंचालक भूविज्ञान आणि खनिकर्ममार्फत टोटल स्टेशन मशीनद्वारे नुकतेच सर्वेक्षण केले आहे. या सर्वेक्षणातून ८२ खाणींनी प्रमाणाबाहेर उपसा केल्याचे निदर्शनास आले आहे. कारवाईच्या भीतीने दगडखाणींचे मालक चांगलेच धास्तावले आहेत.
नवी मुंबईतील दगडखाणींवर टाच
By admin | Updated: March 25, 2016 02:56 IST