मुंबई : राज्यातील ४३ हजार ६६३ गावांपैकी पन्नास पैशांपेक्षा कमी पैसेवारी असणारी तब्बल १९ हजार ५९ गावे आहेत. मराठवाडा आणि विदर्भातील काही जिल्ह्यांत पावसाअभावी खरीप हातून गेले, तर दुसरीकडे अवकाळी पावसाने रब्बी पिकांची हानी झाल्याने शेतकऱ्यांवर दुष्काळाचे गंभीर संकट ओढावले आहे. यावर मात करण्यासाठी केंद्र सरकारकडे किमान दीड हजार कोटींची मागणी करण्याचा निर्णय मंगळवारी झालेल्या राज्य मंत्रिमंडळाच्या बैठकीत घेण्यात आला.अवर्षण, पूर, गारपीट अशा आपत्तींमुळे शेतकऱ्यांचे होणारे नुकसान टाळण्याकरिता राज्यात मंडल स्तरावर २ हजार ६५ ठिकाणी स्वयंचलित हवामान केंद्र स्थापन करण्याची कार्यवाही त्वरित करण्याकरिता डिसेंबरपर्यंत निविदा मागवण्याचे आदेश मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी दिले.दुष्काळी परिस्थितीची पाहणी करण्यासाठी महसूलमंत्री एकनाथ खडसे चार दिवस मराठवाड्याच्या दौऱ्यावर जाणार आहेत. प्रत्येक जिल्ह्यात दोन दिवस आणि विदर्भात एक दिवस असा दौरा झाल्यानंतर २७ तारखेला औरंगाबादेत मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या अध्यक्षतेखाली एक बैठक होईल व त्यात दुष्काळाच्या परिस्थितीचा आढावा घेतला जाईल. एकंदरीत परिस्थिती पाहता यावर मात करण्यासाठी जवळपास दीड हजार कोटी रुपये लागतील, असे खडसे यांनी ‘लोकमत’शी बोलताना सांगितले.
अर्धा महाराष्ट्र दुष्काळग्रस्त!
By admin | Updated: November 19, 2014 05:52 IST