राहुल वाडेकर,
विक्रमगड- सद्यस्थितीत पावसाचा जोरदार तडाखा सुरु असुन याचा परिणाम सर्वच स्तरावर होतांना दिसत आहे. अतिपावसामुळे भातशेती धोक्यात येण्याची शक्यता शेतकरी वर्गाकडून वर्तविण्यात येत आहे.जास्त पावसामुळे पेरण्यात आलेले भात,तसेच तयार होत असलेली भात रोपे कुजण्याचा संभव असून त्यामुळे शेतकऱ्यांचे नुकसान होण्याची चिन्हे दिसत आहेत.तर विक्रमगड आपत्कालीन कार्यालयास भेट दिली असता त्यांनी येत्या ४८ तासांत अतिवृष्टीचे संकेत ठाणे कट्रोल विभागाकडून देण्यांत आल्याचे सांगितले.याबाबत तत्काळ सर्व शासकीय यंत्रणा, कार्यालयीन विभागास खबरदारीच्या सूचना देण्यांत आल्या असून नागरिकांना आवाहन करण्यांत आले की,खबरदारी घेऊन बाहेर जाणे शक्यतो टाळावे, प्रवास टाळावा व खबदारी घ्यावी, दरम्यान गेल्या तीन दिवसांत विक्रमगडमध्ये १८० मि.मि,तलवाडयात २५० मि.मि.व आतापर्यत विक्रमगड-५३९.५ तर तलवाडा-६५३ मि.मि.पावसाची नोंद करण्यांत आल्याचेही सांगण्यात आले. गेल्या वर्षी जून,जुलै कोरडेच गेले होते तर यंदा जूनच्या पंधरवडयापासून चालू झालेला पाउस थांबतच नसल्याने भातशेती धोक्यात आल्याने शेतकरी वर्ग चिंंतेत सापडला आहे.भात लावणीकरीता पावसाची आवश्यकता असते परंतु अति पावसामुळे भातरोपे कुजण्याचा संभव आहे.अजुनही अनेक शेतकऱ्यांची पेरणीची कामे खोळंबली आहेत.तर अनेक भागात रोपे तयार होत आहे.त्यानंतर लावणीची कामे होतील.सद्यस्थित जरी परिस्थिती आटोक्यात असली तरी पावसाचे प्रमाण असेच राहील्यास शेतीस धोका निर्माण होउ शकतो असे जाणकार शेतकऱ्यांकडुन सांगीतले जात आहे. दरम्यान अतिपावसामुळे रस्त्यांची नुसती चाळणझाली आहे.तर नदी नाले ओसांडुून वाहत असल्याने गावातील-खेडयातील जनतेचा शहराशी दोन दोन दिवस संपर्क होत नाही.कामे रेंगाळली आहेत.वाहतुक मंदावलेली आहे. कमी उंची असलेल्या पुलावरुन पाणी वाहतांना दिसत आहे. दरम्यान सर्वत्र पावसाने थैमान घातलेले असून काहीकाळ पावसाने विश्रांती घ्यावयास हवी जेणेकरुन उर्वरीत शेतीची कामे योग्य पध्दतीत होऊन शेतीसाठी उपयुक्त ठरेल अशी भावना शेतकरी व्यक्त करीत आहेत.यंदा पावसाचे प्रमाण गेल्यावर्शीपेक्षा चांगले आहे. त्यामुळे शेतीकामांना वेग आलेला आहे. शेतकरी शेतीच्या कामांत गुुंतलेले दिसत आहेत.तालुक्यात आतपर्यत विक्रमगड सेक्शनमध्ये ५४० मि.मि तर तलवाडा सेक्शनमध्ये ६५३ मि.मि पावसाची नोंद करण्यांत आली असुन पावसाचा जोर कायम आहे.- आयुब तांबोळी, निवासी नायब तहसिलदार