मुंबई : दमण गंगा-पिंजाळ खोऱ्यातले ७५ टक्के पाणी महाराष्ट्राला मिळणार आहे, ते सगळे पाणी मुंबईला दिले जाईल. ज्यामुळे मुंबईचा पाण्याचा प्रश्न कायमचा सुटेल आणि वैतरणाचे पाणी गोदावरीत नेले जाईल, असे सांगून महाराष्ट्राच्या वाट्याचे थेंबभरही पाणी अन्य कोणाला दिले जाणार नाही, अशी ग्वाही मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी विधानसभेत दिली.राज्यपालांच्या अभिभाषणावरील चर्चेला उत्तर देताना त्यांनी मुंबईसह राज्यातले अनेक विषय मांडले. दुष्काळ आणि अवकाळी पाऊस, गारपिटीने त्रस्त झालेल्या शेतकऱ्यांचे आणि सरकारपुढचे संकट संपलेले नाही, येत्या १३ आणि १४ तारखेला पुन्हा काही भागांत गारपिटीची शक्यता भारतीय हवामान खात्याने वर्तविलेली आहे. त्यामुळेच सरकारने पॅकेज घोषित केलेले नाही, असेही फडणवीस यांनी सांगितले. तब्बल दोन तास केलेल्या भाषणात त्यांनी नागपूर अधिवेशनात केलेल्या भाषणाचीच पुनर्रावृत्ती केली. ठिबक सिंचनाचे पैसे तीन वर्षे आघाडी सराकरने दिले नाहीत, असा आरोपही त्यांनी केला. आदिवासींच्या आरक्षणाला धक्का न लावता धनगर समाजाला आरक्षण देण्याची शासनाची मानसिकता आहे असे सांगून त्यासाठी तीन बैठका झाल्याचे ते म्हणाले. टोल नाक्याच्या करारात बाय बॅक नाही मुंबई -पुणे व मुंबई एन्ट्री पॉर्इंट या बड्या टोल नाक्यांचे करार करताना आघाडी सरकारने बाय बॅकचा मुद्दाच करार करतेवेळी टाकला नाही. त्यामुळे हे करार रद्द करता येत नाहीत, तरीही आम्ही वेळ पडल्यास कोर्टात जाऊ, पण टोलमुक्त करण्याची आमची भूमिका कायम ठेवू असेही मुख्यमंत्री म्हणाले. टोल करार करताना राज्याला १५ टक्के वाहनांवर पासेस देण्याचा अधिकार आहे. प्रत्यक्षात ही सूट घेणारी एकच टक्का वाहने आहेत. उर्वरित १४ टक्के सूट थेट ठेकेदारांना करार करुन दिली गेल्याचा गौप्यस्फोटही मुख्यमंत्र्यांनी केला.(विशेष प्रतिनिधी)
गुजरातचे पाणी मुंबईला!
By admin | Updated: March 13, 2015 05:48 IST