कळंबोली : कळंबोली वसाहतीतील करवली चौकातील उद्यान आणि स्मृती गार्डनची सध्या दुरवस्था झाली आहे. येथील खेळणी तुटल्याने बच्चे कंपनीचा हिरमोड होत आहे. शुक्र वारी शिवसेनेने सिडकोला निवेदन देऊन उद्यानात नवीन खेळणी बसावावीत, तसेच उद्यानात स्वच्छता व डागडुजी करावी, अशी मागणी केली आहे. करवली नाक्यावरील उद्यान आणि स्मृती गार्डन ही दोनच ठिकाणे विरंगुळ्यासाठी आहेत. मात्र उद्यानाची दुरवस्था झाल्याने नागरिकांची गैरसोय होत आहे. येथील पाळण्याबरोबरच इतर खेळणीही तुटलेली आहेत. उद्यानाच्या सुशोभीकरणासाठी कोट्यवधींचा खर्च करण्यात आला आहे. या ठिकाणी लहान कॅनल विकसित करण्यात आले होते. येथील कारंजे तर गेल्या कित्येक वर्षांपासून बंद अवस्थेत असून त्याकडे सिडकोने दुर्लक्ष केले आहे. ते जर कायम सुरूच ठेवायचे नव्हते तर विकसित केले कशाला, असा सवाल ज्येष्ठ नागरिक आत्माराम कदम यांनी उपस्थित केला आहे. अॅम्पी थिएटरचा किती वापर होतो याबाबत प्रश्नचिन्ह उपस्थित करण्यात आले आहे. उद्यानातील बहुतांश दिवे बंद असतात. शुक्र वारी शिवसेनेचे विधानसभा संघटक दीपक निकम आणि आत्माराम कदम यांच्या नेतृत्वाखाली विभागप्रमुख कृष्णा कदम, घोट कॅम्पच्या सरपंच कविता कदम, भाऊ पावडे, शाखा प्रमुख वाल्मीकी आहेर यांच्यासह शिवसेनेच्या पदाधिकाऱ्यांनी कार्यकारी अभियंता कापसे यांची भेट घेतली व त्यांना निवेदन सादर केले. तुटलेल्या ठिकाणी नवीन खेळणी बसवावी, त्यामध्ये आणखी वाढ करावी, तसेच उद्यान सुस्थितीत असावेत याकरिता सिडकोने खबरदारी घ्यावी, अशी मागणी शिवसेनेच्या वतीने करण्यात आली. सिडको अधिकाऱ्यांनी लवकरच दुरुस्ती करण्याची ग्वाही यावेळी दिली.नालेसफाईबाबतही नाराजीकळंबोली वसाहतीत मान्सूनपूर्व नालेसफाई चांगली न झाल्याने पावसाच्या पाण्याचा निचरा होत नसल्याचा मुद्दाही शिवसेनेच्या शिष्टमंडळाने उपस्थित केला. त्यामुळे जास्त पाऊस झाल्यास पूरजन्य परिस्थिती निर्माण होवू शकते यास सिडको जबाबदार राहील असे निवेदन म्हटले आहे. याबाबत त्वरित खबरदारी घेण्याची मागणी करण्यात आली.
कळंबोलीतील उद्यानाची दुरवस्था
By admin | Updated: June 29, 2016 02:25 IST