बुलडाणा : भाजपाचे सरकार हे शेतकर्यांच्या प्रती संवेदनशील नाही. त्यांना शेतकर्यांशी काहीही घेणे-देणे नाही. केवळ घोषणांचा पाऊस अन् स्वप्नांची मालिका दाखविणारे हे सरकार असल्याची टीका विधानसभेचे विरोधी पक्षनेते राधाकृष्ण विखे पाटील यांनी केले. ना. विखे पाटील शुक्रवारी बुलडाण्यात आले असता त्यांनी पत्रकारांशी संवाद साधला. ते म्हणाले की, या सरकारच्या सर्व घोषणा या पोकळ आहेत. मंत्र्यांमध्ये वर्चस्व व नेतृत्वाची स्पर्धा लागली आहे. आधी घोषणा करायची, मग चिंतन करायचे, असा सर्व उरफाटा कारभार सुरू असल्याने शेतकर्यांना वार्यावर सोडले आहे. पाणी टंचाईच्या झळा जोरात बसत असून, आमच्या सरकारने टँकरसाठी तहसील स्तरावर अधिकार दिले होते. आता या सरकारने विभागीय स्तरावर अधिकार दिल्याने टँकरच्या मंजुरीसाठी ग्रामस्थांना हेलपाटे घ्यावे लागत आहेत. सत्ताधार्यांचा समाचार घेताना ते म्हणाले की, सध्या एका प्रकरणात न्यायालयीन कोठडी अंतर्गत जिल्हा रुग्णालयात उपचार घेत असलेले काँग्रेसचे माजी आमदार दिलीपकुमार सानंदा यांची त्यांनी भेट घेतली. या सरकारमध्ये शिवसेनेचे अस्तित्व जाणवत नसून, ते केवळ भाजपमागे फरफटत जात आहे. देशासमोर अनेक आव्हाने, संकटे उभी असताना सरकार डिजिटल इंडिया, मेक इन इंडियासारख्या योजनेत गुंतून पडले आहेत. राज्य शासनाची दशाही सारखीच असून, भीषण दुष्काळ, टंचाई, नापिकी, शेतकरी आत्महत्या, मदत, पुनर्वसन या सर्वच पातळ्यांवर संवेदनहीन राज्य शासन अपयशी ठरले आहे. दुष्काळ निधी वाटपात कापूस उत्पादकांना वगळले व नंतर काल-परवा त्यांनाही मदत करू, अशी पोकळ घोषणा केली. दुष्काळी भागातील प्रामुख्याने मराठवाड्यातून मोठय़ा प्रमाणावर होणारे स्थलांतरण, मनरेगा व रोहयोची कामे सुरू करून सर्वसामान्यांना दिलासा देण्यात राज्य शासन कमी पडत असल्याचा आरोप त्यांनी केला.
घोषणांचा पाऊस, स्वप्नांची मालिका दाखविणारे सरकार
By admin | Updated: February 13, 2016 02:34 IST