तलासरी : आदिवासींमध्ये आता शिक्षणाची आवड निर्माण होत असून विद्यार्थी जास्तीत जास्त शिक्षण घेण्याचा प्रयत्न करत आहेत. परंतु शासनाकडून शिक्षणाच्या सवलती आदिवासी भागात उपलब्ध केल्या जात नसल्याने त्यांना शिक्षण सोडावे लागत आहे. आदिवासीभागातील शिक्षण प्रसाराबाबत शासनच उदासीन आहे असा आरोप खासदार चिंतामण वनगा यांनी केला आहे.तलासरी तालुक्यात इयत्ता आठवी व नववी विद्यार्थी प्रवेशाची समस्या अत्यंत गंभीर असून तुकडयाना मान्यता मिळत नसल्याने प्रवेशा अभावी शेकडो विद्यार्थ्यांना शिक्षण सोडून बाल मजुरी कडे वळावे लागते. तुकडया मान्यतेचे प्रस्ताव शासनस्तरावर प्रलंबित आहेत. प्रवेश मिळत नसल्याने पालकासह विद्यार्थ्यांनी वनगा यांची भेट घेतली यावेळी शाळांची पाहणी केली असता तुकडया नसल्याने एकेका तुकडीत दोनशे विद्यार्थी बसलेले आढळून आले.आठवी प्रवेशाची समस्या गंभीर असल्याने जिल्हा परिषदेच्या दहा शाळामध्ये आठवीचे वर्ग सुरु करण्यात आले आहेत. परंतु, आठवी नंतर नववीच्या प्रवेशाचा प्रश्न निर्माण झाला असून जिल्हा परिषदेच्या शाळातील चारशे तेहतीस विद्यार्थी नववी प्रवेशासाठी वणवण फिरत आहेत. पंचायत समितीच्या शिक्षण विभागाकडून शाळा संस्थाच्या नावे पत्रे दिली जात आहेत, परंतु आधीच आठवी नववीचे वर्ग तुडुंब भरलेले त्यात नववीच्या जादा विद्यार्थ्यांना प्रवेश कसा द्यायचा असा प्रश्न आहे. (वार्ताहर)सर्वच विद्यार्थ्यांना प्रवेश देण्याचा प्रयत्न सुरु आहे. कोणीही वंचित राहणार नाही.- राहुल धूम, बीडीओ, पंचायत समिती, तलासरी प्रवेश सर्वांना देण्यात आला आहे. तरीही कोणी बाकी असेल तर शिक्षण विभागाशी संपर्क साधावा प्रवेश मिळवून देण्यात येईल - के. बी. सुतार, गटशिक्षण अधिकारी पंचायत समिती, तलासरी
आदिवासी विद्यार्थ्यांच्या शिक्षणाबाबत शासन उदासीन - खासदार वनगा
By admin | Updated: July 1, 2016 03:49 IST