ठाणे : डोंबिवलीच्या मानपाडा भागातील कोठारी कम्पाउंडमधील घाऊक बाजाराचे गोदाम लुटण्यासाठी आलेल्या पाच जणांच्या सशस्त्र टोळीला गुन्हे अन्वेषण विभागाच्या मध्यवर्ती शोध पथकाने अलीकडेच जेरबंद केले होते. या टोळीकडून शस्त्रसामग्रीही हस्तगत करण्यात आली होती. याच टोळीने भिवंडीतील एका कंटेनरसह ४० लाखांच्या ऐवजाचाही अपहार केल्याचे उघडकीस आले आहे. हा सर्व ऐवज हस्तगत करण्यात आला आहे.दीपक यादव रा. भिवंडी, चंद्रेश बिंद रा. मानखुर्द, सलाऊद्दीन खान रा. कुर्ला, विश्वनाथ बिंद रा. भिवंडी आणि जावेद खान रा. कुर्ला अशी अटक केलेल्या टोळीतील दरोडेखोरांची नावे आहेत. कोठारी कम्पाउंडमधील मुकेश ट्रेडिंग कंपनी या दुकानात ते दरोडा घालणार असल्याची माहिती गुन्हे अन्वेषण विभागाच्या मध्यवर्ती शोध पथकाला मिळाली होती. त्यानुसार, या दरोड्यापूर्वीच पोलीस निरीक्षक देविदास घेवारे यांच्या पथकाने त्यांना ११ डिसेंबर रोजी पहाटे ४ वा.च्या सुमारास जेरबंद केले होते. घेवारे यांच्यासह सहायक पोलीस निरीक्षक अशोक भंडारी, अनिल भवारी, उपनिरीक्षक वसंत कांबळे, हवालदार गोविंद सावंत, सुरेश कदम आणि जयकर जाधव यांच्या पथकाने ही कारवाई केली होती. न्यायालयाने त्यांना पोलीस कोठडी दिल्यानंतर पोलीस ‘चौकशी’त त्यांनी आणखी काही गुन्हे कबूल केले. ही टोळी मूळची उत्तर प्रदेशातील असून दीपक यादव हा कोणत्याही ट्रान्सपोर्ट व्यावसायिकाकडे बदली ड्रायव्हर म्हणून जायचा. नंतर, दीपकसह त्याचे इतर साथीदार मालाने भरलेला कंटेनर किंवा ट्रक अपेक्षित ठिकाणी नेण्याऐवजी दिल्ली, पानिपत, राजस्थान या भागात नेऊन त्यातील लाखोंचा माल विकून पसार होत. (प्रतिनिधी)
चाळीस लाखांचा ऐवज केला हस्तगत
By admin | Updated: December 29, 2014 05:17 IST