भांडेवाडी परिसरातील वस्त्या आजाराच्या विळख्यात मंगेश व्यवहारे - नागपूरशहरातून निघणारा सर्व कचरा भांडेवाडी डम्पिंग यार्डमध्ये साठविला जातो. या कचऱ्याचा परिणाम भांडेवाडी परिसरातील नागरिकांच्या आरोग्यावर होत आहे. भांडेवाडीच्या आजूबाजूच्या वस्त्यांमध्ये घरोघरी रुग्ण आहे. डेंग्यूचा आजार परिसरात चांगलाच फोफावला आहे. परिसरातील नागरिकांच्या वारंवार तक्रारी झोन कार्यालयाकडे जात आहे. त्यांच्या तक्रारीवर उपचार करणारे प्रशासन मात्र ढिम्म आहे. या नरकयातनेतून सोडवा, अशी ओरड येथील नागरिक करताहेत. पूर्व नागपुरात आरोग्याच्या समस्येने बजबजलेला भांडेवाडी आजूबाजूचा परिसर आहे. कचरा डम्पिंग यार्डमुळे दुर्गंधी आणि डासांचा उद्रेक प्रचंड प्रमाणात आहे. या यार्डच्या आजूबाजूला जयदुर्गानगर, दीपनगर, एकतानगर, खुशीनगर, अंबेनगर, तुलसीनगर, अब्बुमियाँनगर, पारडी झोपडपट्टी या वस्त्या आहेत. नीरीने हा परिसर प्रदूषित असल्याचा अहवाल महापालिकेला दिला आहे. येथील विहिरीचे, बोअरचे पाणी प्रदूषित झाले आहे. दुर्गंधीमुळे येथील लोकांचे जगणे असह्य झाले आहे. या वस्त्यांमध्ये अनेकांनी प्लॉट घेतले, मात्र दुर्गंधीमुळे त्यांनी येथे वास्तव्य करणे टाळले. त्यामुळे रिकाम्या प्लॉटवर घाण पसरली आहे. परिसरात गटार लाईन नसल्याने, अनेकांनी रिकाम्या प्लॉटवर गटाराचे पाणी सोडले आहे. रिकाम्या प्लॉटवर झाडेझुडपे वाढली आहेत. काही प्लॉटवर कचरा घर झाले आहे. घाण आणि दुर्गंधीमुळे वर्षभर परिसरात घरोघरी रुग्ण आढळतात. सध्या तर मलेरिया, डेंग्यू या आजाराचे रुग्ण तापाने फणफणत पडले आहे. शहरात सर्वाधिक डेंग्यूच्या आजाराचे प्रमाण भांडेवाडी परिसरात असल्याचा दावा येथील डॉक्टरांनी केला आहे. मात्र प्रशासनाकडून कुठलाही सर्व्हे झाला नाही. आरोग्याच्या उपाययोजना करण्यात आल्या नाही. यासंदर्भात परिसरातील वॉर्ड सुधार समितीतर्फे मनपाच्या लकडगंज झोनला वारंवार तक्रारी करण्यात आल्या. डासांवर अंकुश मिळविण्यासाठी जंतूनाशकाची फवारणीची मागणी केली. त्याकडेही दुर्लक्ष केल्याचा आरोप समितीने केला. डम्पिंग यार्डला लागून शाळा, महाविद्यालय आहे. लोकांनी घरे बांधली आहे. आरोग्याच्या दृष्टीने अतिशय संवेदनशील परिसर असतानाही, परिसरातील लोकप्रतिनिधी अथवा प्रशासन याकडे डोळेझाक करत आहे. दीपनगरातील आकाश बोरसरे नावाचा युवक गेल्या २० दिवसापासून आजारी आहे. मेयो रुग्णालयात उपचार घेतल्यानंतरही त्याच्या आजाराचे निदान झालेले नाही. सध्या त्याची अवस्था अतिशय गंभीर आहे. खदानीमुळे नागरिक त्रस्त दीपनगरात असलेली खदान येथील नागरिकांसाठी डोकेदुखी ठरत आहे. गडरलाईन नसल्याने येथे परिसरातील घाण पाणी सोडण्यात आले आहे. त्यामुळे पाणी दूषित झाले आहे. परिसरात दुर्गंधी पसरली आहे. दुर्गंधी आणि डासांमुळे घरात राहणे कठीण झाले आहे. खदानीमुळेच आजार वाढले आहे. आजपर्यंत ही खदान स्वच्छ झाली नाही. कधीही जंतूनाशकाची फवारणी झाली नाही.
या नरकयातनेतून आम्हाला सोडवा!
By admin | Updated: November 14, 2014 00:45 IST