ऑनलाइन टीम
मुंबई, दि. १ - ढुँढूँ बारे सैंया तोहे सकल बन बन.. बिदन तिहारी कोऊ न जाने... या बंदिशीने अभिजात संगीतप्रेमींना मंत्रमूग्ध करणा-या व जयपूर अत्रौली घराण्याचा घरंदाज वारसा जपणा-या गानयोगिनी धोंडूताई कुलकर्णी यांचे रविवारी मुंबईत वृध्दापकाळाने निधन झाले. त्या ८५ वर्षाच्या होत्या.
जयपूर अत्रौली घराण्याच्या बुजुर्ग गायिका म्हणून ओळखल्या जाणा-या धोंडूताई कुलकर्णी यांचा जन्म २३ जुलै १९२७ मध्ये कोल्हापूरमधील हिरवडे गावात झाला. गणेश कुलकर्णी या सर्वसामान्य शिक्षकांच्या घरी जन्मलेल्या धोंडूताई यांनी वयाच्या पाचव्या वर्षापासूनच शास्त्रीय संगीताचे धडे घेतले. कोल्हापूरात उस्ताद नत्थनखाँ यांच्याकडे सुरुवातीचे शिक्षण घेतल्यावर त्यांनी जयपूर अत्रौली घराण्याचे थोर गायक उस्ताद अल्लादियाखाँ यांच्याकडे संगीताचे शिक्षण घेतले. वयाच्या आठव्या वर्षी त्यांनी प्रथमच रेडिओवर एक कार्यक्रमही सादर केला. १९५०मध्ये अल्लादियाखाँ यांच्या निधनानंतर लक्ष्मीबाई जाधव व ख्याल गायकीच्या अनभिषिक्त सम्राज्ञी केसरबाई केरकर या धोंडूताईंना गुरु म्हणून लाभल्या. जयपूर घराणाच्या गायकीची विशूध्द परंपरा धोंडूताईंनी पुढे चालवली. शास्त्रीय संगीतात ठसा उमटवूनही धोंडूताई नेहमीच अत्यंत साधेपणाने राहायच्या. धोंडूताई कुलकर्णींनी गायलेल्या असंख्य बंदिशी आजही रसिकांना मंत्रमूग्ध करतात. घराण्याची परंपरा पुढे नेताना धोंडूताईंनी अनेक गायकांना घडवलही. पण ग्लॅमरपासून त्या सदैव लांब राहिल्या.
रविवारी दुपारी बोरीवली येथील निवासस्थानी धोंडूताई कुलकर्णी यांनी अखेरचा श्वास घेतला. त्यांच्या निधनाने शास्त्रीय संगीतविश्वात शोककळा पसरली आहे. शास्त्रीय संगीताचा आधारवड हरपला अशी भावना संगीत क्षेत्रात व्यक्त होत आहे.