संकेत गोयथळे - गुहागर तालुक्यात जिल्ह्याच्या तुलनेत सर्वांत कमी पावसाची नोंद होते. असे शासकीय आकडेवारीनुसार स्पष्ट होते. डोंगरदऱ्यांमध्ये वसलेल्या गावांमुळे पाणी साठवण क्षमता कमी आहे. यातूनच धोपावे, साखरी त्रिशूळ, पडवे आदी गावांचा पाणीप्रश्न न सुटल्याने वर्षानुवर्षे टँकरने पाणीपुरवठा करावा लागत आहे. तालुक्याला भास्कर जाधवांच्या रुपाने मंत्रिपद मिळूनही अद्याप या गावांचा पाणीप्रश्न सुटलेला नाही.आमदार भास्कर जाधव यांनी तालुक्याचा पाण्याचा कृती टंचाई आराखडा बनवण्यासाठी जानेवारी अखेर गुहागर पंचायत समितीमध्ये विशेष बैठक घेतली. त्यानुसार साखरीत्रिशूळ, मधील गवळवाडी, पालशेत निओशीमधील भोसलेवाडी वरची वाडी, काताळेमधील नवानगर, धोपावेमधील तरीबंदर, जाधववाडी, पाटीलवाडी, गुडेकरवाडी, विघ्नहर्तावाडी, हनुमानवाडी, पडवेमधील वरील मोहल्ला, रिफाझ मोहल्ला, खतीब मोहल्ला, भाटलेवाडी, उगवतवाडी, मावळतवाडी, रहिमान मोहल्ला, शिवणेमधील मधलीवाडी, ठोंबरेवाडी, दहयांबेवाडी, खालची वाडी, गावकरवाडी, मेस्त्रीवाडी, आबलोली व पाभरेमधील धनगरवाडी आदी ९ गावे व २६ वाड्यांवर टँकरने पाणीपुरवठा करावा लागणार आहे.तालुक्यातील पाणी टंचाईचे प्रमाण कमी होत असले तरी विहिरी आटल्यामुळे विंधन विहिरींचे पाणी कमी झाल्याने व नळपाणी योजना बंद पडल्या आहेत. त्यामुळे टंचाईग्रस्त गावे व वाड्यांमध्ये वाढ होताना दिसत आहे. याप्रमाणे गेल्या वर्षी ८ गावांमधील ३८ वाड्यांना पाणीटंचाईची झळ पोहोचली होती. ही झळ कमी करण्यासाठी टंचाई कृती आराखडा बैठकीतून या गावातील ११ वाड्यांसाठी नवीन विंधन विहीर खोदाईचे नियोजन करण्यात आले आहे. दोन गावांतील २ वाड्यांसाठी विंधन विहीर दुरुस्ती, तर चिखली मांडकरवाडी येथील बंद पडलेली नळपाणी पुरवठा योजना पुन्हा सुरु करुन येथील एक गाव एका वाडीतील पाणी टंचाईवर मात करण्यात येणार आहे.अडूर कोंडकारुळ येथील पाणीटंचाई यावेळी टळली आहे. येथे नवीन नळपाणी योजना सुरु झाली आहे. शिवणे येथील नळपाणी योजना बंद पडल्याने येथील आठ वाड्यांना टंचाईची झळ बसणार आहे. निओशी - वरचीवाडी येथे यावर्षी टंचाईची झळ पोहोचली. परंतु येथील भौगोलिक रचनेनुसार वेगवेगळ्या योजना करण्याचे नियोजन करण्यात आले आहे. शीर टाकेवाडीतील विहिरीला पाणी भरपूर असून, या ठिकाणी सौरऊर्जेवर पंप बसविण्याचे नियोजन करण्यात आले आहे. पाटपन्हाळे गावाची नळपाणी योजना बंद पडली आहे. अन्य योजनातून यावर मात करण्याचे नियोजन चालू असून ग्रामपंचायतीला महसूल मिळवून देणाऱ्या शृंगारतळी बाजारपेठेचा मात्र या नियोजनात विचार झालेला नाही.आबलोली गावातील धनगरवाडी डोंगरमाथ्यावर वसल्याने येथे जाणारा रस्ता हा तीव्र चढावाचा आहे. त्यामुळे येथे टँकर नेण्यास वेळ लागतो.पाभरे धनगरवाडीची पाणीटंचाई आराखड्यात भर पडली आहे. या धनगरवाड्यांना पाण्यासाठी दरवर्षी काही किलोमीटरची पायपीट करावी लागत आहे. यावर कोणतेही उपाय होत नसल्याने या वाड्यांची पाणीटंचाई अटळ आहे.काहीनी राजरोसपणे धरणातून चोरट्या पद्धतीने पाईप टाकून कोणतीही परवानगी न घेता बांधकाम विभागाच्या रस्त्यानजीक खोदाई करुन तब्बल तीन ते चार किलोमीटर पाईपलाईनद्वारे २४ तास पाण्याची लूट सुरु केली. यातूनच सध्या मोडकाआगर धरणावर अवलंबून असणाऱ्या गुहागर नगरपंचायतीसह असगोली, पालशेत, वरवेली गावांना आज पुरेसे पाणी मिळत असले तरी भविष्यात पाणी टंचाईला सामोरे जाण्याची वेळ येईल हे लक्षात घेऊन संबंधित ग्रामस्थांनी याबाबत उठाव करावा लागेल, असे म्हटले जात आहे. आता कठोर उपाययोजनांची गरज आहे.धोपावेमधील काही वाड्यांमध्ये वर्षानुवर्षे पाणीटंचाई असते. निवडणुकीपूर्वी झालेल्या राजकीय सभांतून येथे नळपाणी योजना राबविण्याची घोषणा करण्यात आली. मात्र, प्रत्यक्षात याबाबत ठोस हालचाल न झाल्याने निवडणूक काळात हा विषय चर्चेचा राहिला. धोपावे गावाला मात्र यावेळीही पाणीटंचाई टळलेली नाही, ही वस्तुस्थिती आहे.बॅरलभर पाण्यासाठी...पडवे गावाचीही याहून वेगळी स्थिती नाही. खाडीकिनारी डोंगराच्या पायथ्याशी दाटीवाटीने वसलेल्या गावात पाणी स्रोत कमी आहेत. मोठी नळपाणी योजनाही नसल्याने येथील सर्वच वाड्यांना दरवर्षी पाणी टंचाईला सामोरे जावे लागते. एवढेच नव्हे; तर अन्य गावातून बॅरलच्या हिशोबाने पिण्याचे पाणी विकत घ्यावे लागते.साखरी त्रिशूळची व्यथादरवर्षी बहुतांश वेळा दाभोळखाडी किनारी वसलेल्या साखरी त्रिशूळ गावात तालुक्यातील पहिला पाण्याचा टँकर सुरु होतो, ही आजपर्यंतची स्थिती आहे. मागील काही वर्षांत टंचाईग्रस्त गावांचे प्रमाण तेवढेच राहिले असले तरी या सर्व वाड्यांना एकाच टँकरद्वारे पाणीपुरवठा करण्याची तारेवरची कसरत करावी लागते. यावर्षी जिल्हा परिषदेकडे चार नवीन टँकर आल्याने यावेळी दोन टँकर मिळतील, अशी अपेक्षा आहे.बंधाऱ्यांना पाणीच नाहीतालुका कृषी विभागाच्यावतीने अनेक ठिकाणी बंधारे बांधण्यात आले. परंतु बंधाऱ्यात पाणी साठत नसल्याने हे बंधारे कोरडे पडले आहेत. ग्रामपंचायत किंवा पंचायत समिती सदस्यांना विचारात न घेता हे बंधारे बांधले गेल्याने कृषी विभागाचे नियोजन पूर्णत: चुकले असून, शेती लागवडीसाठी लागणाऱ्या पाण्यासाठी नव्याने बंधारे बांधण्याची वेळ आली आहे.मोडकाआगरच्या पाण्यासाठी प्रयत्नगुहागरमधील वाढत्या पर्यटनातून भविष्यात प्लॉटिंग व बंगलोज्मुळे गावाची लोकसंख्या संख्या वाढणार आहे. पाण्याची मागणी वाढणार आहे. त्यामुळे काहींनी मोडका आगर धरणाचे पाणी मिळावे, यासाठी प्रयत्न सुुरु केले आहेत.
माजी मंत्री तरी पाणीप्रश्नांची जंत्री...!
By admin | Updated: February 4, 2015 23:51 IST