एफडीएची कारवाई : अस्वच्छ ठिकाणी ‘पॅकिंग’नागपूर : अन्न व औषधी प्रशासन विभागाने (एफडीए) रेल्वेगाड्यांसाठी तयार करण्यात येणाऱ्या भोजनाचे साहित्य जप्त केले आहे. गुरुवारी दुपारी ३ वाजता बजेरिया येथील एका छोट्या खोलीत भोजनाचे पॅकिंग करताना ही कारवाई केली आहे.‘एफडीए’च्या अधिकाऱ्यांनी दिलेल्या माहितीनुसार, अतिशय घाणेरड्या वातावरणात भोजनाची पॅकिंग करण्यात येत होती. या निकृष्ट भोजनाचे काही नमुने ताब्यात घेऊन उर्वरित भोजन नष्ट करण्यात आले. तयार करण्यात आलेले भोजन रेल्वेगाड्यात विकण्यासाठी आणल्या जाणार होते. कुठलाच परवाना नसताना दूषित वातावरणात तयार होणाऱ्या या भोजनामुळे आरोग्यास हानी पोहोचू शकते. एफडीएने येथून १० किलो तांदूळ, ५ किलो तयार झालेली भाजी जप्त केली. ही कारवाई सहआयुक्त शिवाजी देसाई, सहायक आयुक्त एन. आर. वाकोडे यांच्या मार्गदर्शनाखाली अन्न सुरक्षा अधिकारी ए. डी. राऊत, किरण गेडाम यांनी केली. रेल्वेगाड्यात मोठ्या प्रमाणात अवैध व्हेंडर्स भोजन विकतात. स्टेशनच्या आजूबाजूच्या परिसरातून भोजन रेल्वेगाड्यात पोहोचविणे सोपे होते. लोकमतने नुकतेच अवैध व्हेंडर्सबाबत वृत्त प्रकाशित केले होते. रेल्वे परिसर आणि रेल्वेगाड्यात अवैध व्हेंडरवर अंकुश ठेवणे रेल्वे सुरक्षा दलाची जबाबदारी आहे. परंतु तरीसुद्धा अवैध व्हेंडर्स रेल्वेगाड्यात भोजन पोहोचवीत असल्याची स्थिती आहे. रेल्वे स्थानकाजवळ मोतिबागमध्ये रेल्वेलाईनला लागून अतिक्रमण झालेल्या परिसरात सडलेली संत्री प्लास्टिक बॅगमध्ये टाकून स्वस्त दरात विकण्यात येत आहेत. यातील बहुतांश संत्री फेकण्याच्या स्थितीतील असतात. काही महिन्यांपूर्वी रेल्वेस्थानकावर होम प्लॅटफॉर्मच्या अखेरीस एका रेल्वेच्या आलमारीतून सोनपापडी जप्त करण्यात आली होती. याशिवाय रेल्वेस्थानक परिसरात खर्रा, सिगारेट, मेवा, दूषित पाण्याची विक्री होत असल्याची स्थिती आहे. (प्रतिनिधी)
रेल्वेसाठी बजेरियात बनते भोजन
By admin | Updated: November 14, 2014 00:50 IST