ठाणे : गेले पाच दिवस सुरू असलेल्या पावसाने जिल्ह्याच्या ग्रामीण भागात काहीशी उसंत घतेली आहे. मात्र शहरी भागात सरींवर सरी सुरू आहेत. तेथील पावसाचे प्रमाण समाधानकारक आहे. दोन दिवसांतील संततधारेमुळे मुंब्रा येथे भिंत कोसळून एकाचा बळी गेला. ठाण्याच्या इतर भागातही भिंत, झाडे कोसळण्याच्या ११ घटना घडल्या. रस्त्याच्या मध्यभागी झाडे कोसळल्यामुळे ठाणे शहरातील वाहतूक व्यवस्था पूर्णत: कोलमडली होती. दरम्यान, सुरूवातीला संततधारेचा अनुभव देणाऱ्या पावसाने सोमवारी काहीकाळ उसंत घेतली असली तरी मंगळवारी कल्याण, डोंबिवली, उल्हासनगर, अंबरनाथ, बदलापूर परिसरात मधूमधून जोरदार सरी कोसळत होत्या. मुरबाड, शहापूरमध्ये अद्याप पुरेसा पाऊस झालेला नसल्याने पाणीटंचाईतून पूर्णत: दिलासा मिळेला नाही. कल्याण-डोंबिवलीत ती टप्प्याटप्प्याने उठवली जात आहे. मात्र ठाण्यातील पाणी बंद आहे. काहीशा उशिराच आलेल्या पावसाने आपल्या गैरहजेरीची कसर भरून काढण्यास सुरूवात केली आहे. शुक्रवारपासून संततधार बरसणाऱ्या पावसाने मंगळवारीही काही काळ संततधार कायम ठेवली. या पावसामुळे शहराच्या अनेक भागात पडझडीच्या घटना घडल्या. मुंब्रा रेतीबंदर येथील विष्णू नामदेव पाटील चाळीची भिंत कोसळून इसमाली ज्योतिबा कांबळे (७५) यांचा जागीच मृत्यू झाला. कोपरीतील गुरु नानक सोसायटीत रार्वती प्रितमानी यांच्या घराचे छत कोसळले. सुदैवाने त्यामध्ये कोणत्याही प्रकारची जीवितहानी झाली नाही. ठाकूरपाडा- मुंब्रा येथील यादव भागवत या चाळीच्या जिन्याचा भाग कोसळल्यामुळे ही चाळवजा इमारत धोकादायक झाली आहे. >वागळे भागात, ज्ञानेश्वरनगर येथे नाल्याची भिंत पडल्याची घटना घडली. यातही कोणत्याही प्रकारची जीवित हानी झाली नाही. या पावसामुळे दोन ठिकाणी आग लागण्याच्या घटना घडल्या. एका ठिकाणी पाणी तुंबले होते. राबोडीतही पाणी तुंबण्याच्या तक्रारी होत्या. ठामपाच्या आपत्कालीन विभागाने आणि अग्निशमन दलाने या आपत्कालीन स्थितीचा योग्य सामना केल्यामुळे कोणत्याही प्रकारची अनुचित घटना घडली नाही. >टंचाईतून दिलासाकल्याण-डोंबिवली परिसरात गेल्या २४ तासात ५२ मिलिमीटर पावसाची नोंद झाली आहे. ठाणे जिह्यात गेल्यावर्षीच्या तुलनेत आतापर्यंत केवळ १० टक्के पाऊस झाला आहे. गेल्यावर्षी या तारखेपर्यंत तीन हजार ८६८ मिमी पाऊस बरसला होता. तर आता केवळ एक हजार ८०७ मिमी पावसाची नोंद झाली असल्याची माहिती जिल्हा आपत्ती नियंत्रण आणि निवारण कक्षातून देण्यात आली. गेल्या काही दिवसांपासून रिमझिम पाऊस बरसत होता. मात्र, सोमवार सकाळपासून मुसळधार पडणाऱ्या पावसामुळे कर्जत, कसारा, टिटवाळा ते सीएसटी या मार्गावरील लोकल सेवा काहीशी विस्कळीत झाल्या होत्या. पावसाळ््यापूर्वी कल्याण-डोंबिवली महानगरपालिका क्षेत्रात तीव्र पाणीटंचाई निर्माण झाली होती. जिल्ह्याला पाणीपुरवठा करणाऱ्या सर्वच धरणांनी तळ गाठल्याने नागरिकांना पाणीटंचाईचा सामना करावा लागत आहे. कल्याण-डोंबिवली पालिका क्षेत्रातील काही भागात तर चार अथवा आठ दिवसातून एक वेळ पाणी मिळत होते. मात्र, पंधरा दिवसांपासून हुलकावणी देणारा पाऊस अखेर बरसू लागल्याने नागरिकांनी सुटकेचा नि:श्वास सोडला आहे.
मुंब्य्रात पावसाने घेतला पहिला बळी
By admin | Updated: June 29, 2016 02:48 IST