कोल्हापूर : आपल्या पहाडी आवाजाने जनसमुदायास मंत्रमुग्ध करून सोडणाऱ्या आणि समाजातील अनिष्ट रूढींवर तितक्यात तिखट शब्दवाणींने प्रहार करणाऱ्या शाहीरतिलक पिराजीराव सरनाईक यांच्या पुण्यतिथीनिमित्त कोल्हापूर महानगरपालिकेतर्फे उद्या, मंगळवारी शाहिरी महोत्सवाचे आयोजन करण्यात आले आहे. पहिलाच महोत्सव असल्याने जिल्ह्यातील दहा निवडक शाहिरी पथकांना त्यामध्ये सहभागी करून घेण्यात आल्याची माहिती महापौर तृप्ती माळवी यांनी आज, सोमवारी पत्रकार परिषदेत दिली.उद्या सकाळी दहा वाजता पेटाळ्यातील राम गणेश गडकरी हॉलमध्ये शाहिरी महोत्सवाचे महापौर तृप्ती माळवी यांच्या हस्ते व आयुक्त विजयालक्ष्मी बिदरी यांच्या अध्यक्षतेखाली उद्घाटन होणार आहे. या समारंभास महापालिकेचे सर्व पदाधिकारी तसेच अधिकारी उपस्थित राहणार आहेत. तत्पूर्वी शाहीरतिलक पिराजीराव सरनाईक विश्वस्त मंडळातर्फे सकाळी नऊ वाजता शिवाजी पेठेतील अर्धा शिवाजी पुतळा येथून दिंडीचे आयोजन करण्यात आले आहे. यंदा प्रथमच अशा प्रकारचा शाहिरी महोत्सव भरविण्यात येत असल्याने जिल्ह्यातीलच दहा शाहिरी पथकांना त्यामध्ये सामावून घेतले आहे. दहाही पथके या महोत्सवात आपली शाहिरी कला सादर करतील. महोत्सवात भाग घेतल्याबद्दल सर्वच पथकांना प्रत्येकी पाच हजार रुपये बक्षीस तसेच मानपत्र, शाल, श्रीफळ, पुष्पगुच्छ देऊन गौरविण्यात येणार आहे.पत्रकार परिषदेस उपमहापौर मोहन गोंजारे, स्थायी समितीचे सभापती सचिन चव्हाण, विरोधी पक्षनेता मुरलीधर जाधव, राष्ट्रवादीचे गटनेते राजेश लाटकर, नगरसेविका माधुरी नकाते, सहायक आयुक्त उमेश रणदिवे, आदी उपस्थित होते. (प्रतिनिधी) राजाराम जगताप यांचा गौरव गेली अनेक वर्षे निष्ठेने शाहिरी कलेची सेवा करणाऱ्या शाहीर राजाराम जगताप (इचलकरंजी) यांचा ‘पिराजीराव सरनाईक पुरस्कार’ देऊन गौरव करण्यात येणार आहे. रोख २१ हजार रुपये, स्मृतिचिन्ह, शाल, श्रीफळ, फेटा असे या पुरस्काराचे स्वरूप आहे. राजाराम जगताप यांचा गौरव गेली अनेक वर्षे निष्ठेने शाहिरी कलेची सेवा करणाऱ्या शाहीर राजाराम जगताप (इचलकरंजी) यांचा ‘पिराजीराव सरनाईक पुरस्कार’ देऊन गौरव करण्यात येणार आहे. रोख २१ हजार रुपये, स्मृतिचिन्ह, शाल, श्रीफळ, फेटा असे या पुरस्काराचे स्वरूप आहे.
पहिल्या शाहिरी महोत्सवाचा डफ आज कडाडणार
By admin | Updated: December 30, 2014 23:39 IST