पंकज पाटील, अंबरनाथ अंबरनाथ-आनंदनगर औद्योगिक वसाहतीत पॅसिफक कंपनीतील आगीमुळे या भागातील कंपन्यांची सुरक्षा कशा प्रकारे वाऱ्यावर सोडण्यात अली आहे, याचा प्रत्यय आला. कंपनीतील रसायन सांडल्याने ते नाल्यामार्गे बाहेर पडत होते. मात्र, ते ज्वलनशील असल्याने त्याने पेट घेतला होता. त्यामुळे परिसरातील इतर कंपन्यांनाही धोका निर्माण झाला. सोमवारी रात्री ९ च्या सुमारास कंपनीतील रसायनाने भरलेले ड्रम वाहून गेले. ते वाहणाऱ्या पाण्यात मिसळल्याने पाण्यानेही पेट घेतला. यामुळे ५० मीटरपर्यंत वाहणारा नाला आगीच्या विळख्यात आला. हा नाला ज्या कंपन्यांजवळून गेला होता, तेथेही आग भडकण्याची शक्यता निर्माण झाली होती. रसायनांवर प्रक्रिया न करताच ती सोडण्यात येत असल्याने मोठा धोका निर्माण होण्याची शक्यता आहे. पॅसिफिक कंपनीतील आगीमुळे कंपनीचा प्लान्ट पूर्णत: नष्ट झाला आहे. आग लागल्यावर कंपनीत सर्व कर्मचाऱ्यांनी पळ काढल्याने त्यांना दुखापत झाली नाही. पहाटे ६पर्यंत आग विझविण्याचे काम सुरू होते. धुराने १ किमी परिसरात डोळे चुरचुरण्याचा त्रास होत आहे.
अंबरनाथमध्ये पाण्यातही लागते आग
By admin | Updated: October 15, 2014 04:15 IST