वैभव गायकर,
पनवेल- गाव वसण्यापूर्वी अस्तित्वात असलेल्या तलावात भराव टाकून अतिक्रमण करण्याचे काम मागील काही दिवसांपासून पनवेल येथील खुटारी गावात सुरू आहे. मौजे रोहिंजन ग्रामपंचायत हद्दीतील खुटारी ग्रामस्थांच्या मालकीच्या सुमारे १० एकर सार्वजनिक जागेवर वसलेल्या या तलावात मोठ्या प्रमाणात भराव टाकण्यात आला आहे. यासंदर्भात ग्रामस्थांनी पनवेल तहसीलदारांकडे लेखी तक्र ार केली आहे. एकीकडे पाण्याचे स्रोत वाचविण्यासाठी शासन जलयुक्त शिवारसारख्या योजना राबवत असताना पनवेलमधील खुटारी गाव त्याला अपवाद आहे. येथील ग्रामस्थ गणेश म्हात्रे यांनी या विषयाला वाचा फोडली असून येथे सुरू असलेला बेकायदा भराव त्वरित थांबवावा यासाठी तहसीलदारांना निवेदन दिले आहे. मात्र महिनाभरापेक्षा जास्त कालावधी उलटून गेल्यानंतर ही कोणतीच कारवाई होत नसल्याने खुटारी येथील ग्रामस्थ आंदोलनाच्या तयारीत असल्याचे म्हात्रे यांनी सांगितले. खुटारी परिसरात सिडको अथवा खासगी जागेत मोठ्या प्रमाणात इमारतींचे बांधकाम सुरू आहे. येथील बेकायदा कामाची चौकशी व्हावी व संबंधित बांधकाम व्यावसायिकांवर गुन्हा दाखल करावा, अन्यथा ग्रामस्थांना उपोषणाचा मार्ग अवलंबावा लागेल असे पत्र ग्रामस्थ गणेश म्हात्रे यांनी तहसीलदार दीपक आकडे यांना दिले आहे. विशेष म्हणजे खुटारीसह रोहिंजन, बीड, किरवली आदी याठिकाणच्या तलावाच्या पाण्यावर याठिकाणची शेती अवलंबून होती. पिण्याच्या पाण्यासाठी देखील परिसरातील हे एकमेव स्रोत ओळखले जात होते.यासंदर्भात माहिती घेतली जाईल. तलावामध्ये भराव केला गेला असेल तर दंडात्मक कारवाई केली जाईल.- दीपक आकडे, तहसीलदार, पनवेल