ठाणे : विधान परिषदेच्या निवडणुकीत शिवसेनेच्या उमेदवाराला मतदान केले नाही, तर राजकीय कारकीर्द संपवेन, अशी धमकी देणाऱ्या मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांना कसली भीती वाटत आहे, असा सूचक सवाल राष्ट्रवादी काँग्रेसचे राष्ट्रीय अध्यक्ष शरद पवार यांनी रविवारी केला. मुख्यमंत्र्यांची भाषा सुधारली असून त्यांचा आत्मविश्वास वाढलेला दिसत आहे, अशी उपरोधिक टिप्पणीही त्यांनी केली.ठाणे स्थानिक स्वराज्य संस्था मतदारसंघातील विधान परिषदेच्या निवडणुकीतील काँग्रेस व राष्ट्रवादी काँग्रेसचे आघाडीचे उमेदवार वसंत डावखरे यांच्या प्रचारार्थ सभेत नगरसेवकांना पवार यांनी मार्गदर्शन केले.पवार म्हणाले की, काँग्रेस-राष्ट्रवादीला हितेंद्र ठाकूर यांची मदत मिळाल्याने डावखरे यांचा विजय निश्चित आहे.यामुळे विधान परिषदेची ही निवडणूक देशाला, राज्याला नवी दिशा देणारी ठरेल, असा विश्वासही त्यांनी व्यक्त केला.आसाममध्ये सत्ता आल्यामुळे जणू देश ताब्यात आला असून सर्वत्र आबादीआबाद असल्याचे भासवत देश काँग्रेसमुक्त करण्याची भाषा पंतप्रधान करीत आहेत. पण, या देशाला गांधी, नेहरूंची विचारधारा आहे. ते विचार संपवण्याचा प्रयत्न केला तर तुम्हीच संपून जाल.डावखरे हे अगदी चार-सहा मतांनी का होईना नेहमी विजयी होतात. त्यामुळे त्यांचे आडनाव बदलून डावखरेऐवजी ‘उजवे’ ठेवायला हवे, अशी टिप्पणी पवार यांनी केली. सर्व नगरसेवकांना शिवसेना-भाजपाने गोव्यात नेले. तेथून कणकवली किती जवळ आहे, हे त्यांना माहिती नाही का, असे उद्गार पवार यांनी नारायण राणे यांच्याकडे पाहून काढताच हशा पिकला. समविचारी पक्षाचे नेते एकत्र आल्यामुळे डावखरे यांचा विजय निश्चित आहे. राज्यात भीषण दुष्काळ असताना व शेतकरी आत्महत्या करीत असताना भाजपा सरकारला दोन वर्षे पूर्ण झाल्याबद्दल सेलिब्रेशन करण्यात दंग आहे, अशी टीका काँग्रेस प्रदेशाध्यक्ष अशोक चव्हाण यांनी केली. (प्रतिनिधी)>देशात अच्छे दिन आलेच नाहीतदेशात अच्छे दिन आले नाहीत, हे या सरकारला विधान परिषद निवडणूक निकालाने दाखवून देऊ, असे मत माजी मुख्यमंत्री नारायण राणे यांनी व्यक्त केले. वेगवेगळ्या पक्षांत मैत्रीचे संबंध ही डावखरे यांची जमेची बाजू असल्याचे राणे म्हणाले.बहुजन विकास आघाडीच्या पाठिंब्याबाबत सध्या व्हॉट्सअॅपवर उलटसुलट मेसेज फिरत आहेत. मात्र, आमचा पाठिंबा केवळ डावखरे यांना असून त्यांना देऊ केलेल्या मतांची संख्या १३५ वरून १५० कशी होईल, याकरिता आपण प्रयत्न करणार असल्याचे पक्षाचे नेते हितेंद्र ठाकूर म्हणाले.
फडणवीस यांना कशाची भीती वाटत आहे ?
By admin | Updated: May 30, 2016 04:28 IST