पालघर/वसई : काही तासांवर आलेल्या बाप्पाच्या आगमनानिमित्त रविवारी बाजारपेठा तुडुंब गर्दीने फुलून गेल्या होत्या. आयताच सुटीचा दिवस असल्याने शहरातील प्रमुख बाजारपेठेमध्ये खरेदीला उधाण आले होते. एरव्ही, एकट्यादुकट्याने होणारी खरेदी सहकुटुंब होताना पाहायला मिळाली. प्रामुख्याने मखर, फुल-हार-पूजेचे साहित्य, किराणा मालाच्या खरेदीसाठी झुंबड उडाली होती.गणपती हा लहानग्यांचा आवडता असल्याने तसेच आदल्या दिवशी सुटी आल्याने बाजारपेठेमध्ये तिप्पट गर्दी उसळल्याचे पाहायला मिळाले. पालघर जिल्ह्यातील पालघर, बोईसर, वसई, विरार, नालासोपारा, विक्रमगड, वाडा, जव्हार, तलासरी, मोखाडा, मनोर या प्रमुख बाजारपेठांमध्ये सायंकाळपर्यंत गर्दीचा उच्चांक पाहायला मिळाला. यंदा महागाईची झळ कायम असतानाही बाप्पासाठी भक्तांनी हात आखडता न घेता सैल सोडल्याने बाजारात मोठी तेजी पाहायला मिळाली.छोटेखानी दुकानांपासून, किराणा स्टोअर, मिठाईवाले, सुपर मार्केट, नॉव्हेल्टी स्टोअर, सर्वांच्या ठिकाणी ग्राहकांची मांदियाळी पाहायला मिळाली. विशेष म्हणजे बाजारातील कासारांकडे महिलावर्ग हिरव्या, लाल, पिवळ्या, निळ्या, पोपटी रंगाचे चुडे भरण्यासाठी गर्दी करताना दिसल्या. हरतालिकापुजनासाठी महिलांकडून फुलखरेदीसाठी मोठी गर्दी झाल्याने खरेदीविक्रीमध्ये तेजी जाणवली. प्रत्येक जण हार, तुरे, तोरणे, पुष्पगुच्छ, नारळ घेत होते. देवाला पाच फळे खरेदीसाठी मोठी मागणी असल्याने फुलांपाठोपाठ फळांच्या विक्रीतही तेजी पाहायला मिळाली. गणपतीच्या आरासासाठी मखर खरेदी किंवा स्वत: सजावट करणाऱ्या तरुण, तरुणींची गर्दी बाजारपेठेमध्ये होती. यंदा मखराचे विविध प्रकार तसेच इको फे्रण्डली कन्सेप्ट बाजारात आल्याने अनेकांनी आपापल्या परीने खरेदी केली. इलेक्ट्रॉनिक्स प्रकारामध्ये चायनापाठोपाठ भारतीय कंपन्यांनीही आपले प्रॉडक्ट उतरवल्याने वैविध्य पाहायला मिळाले. रेडिमेड मखरांमध्ये बंगाली कलाकारांनी बनवलेल्या कलाकृतींनी आपले वेगळेपण दाखवल्याने खरेदी करताना अनेक पैलू पाहायला मिळाले. आदिवासींना मिळाला रोजगारगणपतीपुजनासाठी शमी, दूर्वा, पत्री, विड्याची पान, केवडा, केळीची पाने यांची विक्री सकाळपासून सुरू असल्याने आदिवासी महिलांना मोठा रोजगार मिळाला. स्थापनेच्या दिवशी गावठी भाज्यांचे नैवेद्य बाप्पाला दाखवण्याचा प्रघात असल्याने पूजा साहित्याबरोबरच भाज्यांचे दरही वधारलेले होते. (प्रतिनिधी)>मनोरमध्ये ४८४ बाप्पांचे आगमनमनोर येथील पन्नास गावांमध्ये वाजतगाजत, गुलाल उधळत तब्बल ४८४ गणपती बाप्पांचे आगमन झाले असून कुणी रिक्षामध्ये तर कोणी कार, जीप, टेम्पो, ट्रकमध्ये मूर्ती घेऊन जाताना दिसत होते. गणपती बाप्पा मोरयाच्या गजराने परिसर दणाणून गेला होता. दरवर्षाप्रमाणे यंदाही आदल्या दिवशीच घरोघरी व सार्वाजनिक मंडळांनी गणपती बाप्पाना वाजतगाजत आणले. रविवारी सावरे, येंबूर, करलंगाव, टाकव्हल, दुर्वेस, हलोली, बोट, दहिसर, ढेकळे, मासवन, धुकटन, भाडोली, नागजरी, नेहे, नांदगाव असे ५० ते ६० गावांतील १५० सार्वजनिक मंडळे व ३३४ घरगुती गणेशभक्तांनी मोठ्या उत्साहात गणेशमूर्ती रस्त्यावर पडलेल्या खड्ड्यांतून मार्ग काढत सुखरूप घेऊन गेले.शाडू मातीच्या गणेशमूर्तीलाही मोठ्या प्रमाणात मागणी दिसत होती. तसेच मनोर बाजारपेठेत सजावट रोषणाईसाठी वस्तू घेण्यासाठी लोकांनी गर्दी केली होती. तर, महिलांनी पूजेचे सामान, मोदक घेण्यासाठी दुकानात गर्दी केली होती.>विक्रमगडमध्ये ४२५ ठिकाणी होणार स्थापनासुखकर्ता, दुखहर्ता गणरायाची सोमवार, ५ सप्टेंबर रोजी विधीवत स्थापना होणार असून गणरायाच्या स्वागतासाठी संपूर्ण तालूका सज्ज झाला आहे. यावर्षी पोलिस स्टेशन परिक्षेत्रात एकंदरित १२० ठिकानी गणेश मंडळांकडून तर ३०५ घरगुती ‘बाप्पा’ची स्थापना होणार आहे.
जिल्ह्यात सर्वत्र ‘मोरया... मोरया’चा गजर
By admin | Updated: September 5, 2016 03:10 IST