अनिरुद्ध पाटील,
डहाणू/बोर्डी- जलसाठ्यांनी तळ गाठल्याने पाण्यासाठी दिवसरात्र एक करावे लागत आहे. मात्र, डहाणूत विकासाच्या नावाखाली काँक्रिट रस्त्याच्या बांधकामासाठी हजारो लीटर पाण्याची नासधूस सुरू आहे. कारवाई अपेक्षित असताना ठेकेदारधार्जिन्या प्रशासनाचा त्याला छुपा पाठिंबा असल्याचा आरोप होत आहे. त्यामुळे आणीबाणी परवडली, पाणीबाणी नको, अशी भावना नागरिकांनी व्यक्त केली आहे. मागील वर्षीच्या कमी पर्जन्यमानाने हल्ली पाणीटंचाई अधिकच तीव्र झाली आहे. जून उजाडल्यापासून जलसाठ्यातून पाणी मिळवण्यासाठी डहाणूतील नागरिकांना दिवसरात्र एक करावे लागत आहे. कुटुंबातील लहानापासून म्हाताऱ्यांपर्यंत सगळ्यांना पहाटे लवकर उठून, रात्री उशिरापर्यंत धडपड सुरू असते. पिण्याच्या पाण्यासाठी माणसांची वणवण असताना जनावरांचा प्रश्न अधिकच बिकट बनला आहे. कुटुंबाची दुरवस्था न पाहवून कर्ज काढून कूपनलिका खोदण्याचे काम युद्धापातळीवर सुरू आहे. पावसाळा सुरू होईपर्यंत, उपलब्ध पाण्याच्या योग्य नियोजित वापराव्यतिरिक्त अन्य पर्याय नाही. ही जीवघेणी परिस्थिती असताना विकासाच्या नावाखाली काँक्रिट रस्त्याच्या बांधकामासाठी हजारो लीटर पाण्याची नासाडी करण्याचे काम घोलवड आणि चिखले गावात हाती घेण्यात आले आहे. या बांधकामासाठी सर्रास पाण्याचा अपव्यय सुरू असताना घसा कोरडा असणाऱ्यांचा जीव कासावीस होत आहे. मात्र, आर्थिक फायद्यासाठी आसुसलेला ठेकेदार विकासाच्या नावाखाली असुरी मजा लुटत आहे. एकंदरीत प्रशासन पातळीवर हा प्रकार थांबणे आवश्यक असताना डहाणूत डोळेझाक सुरू असल्याने येथील प्रशासन ठेकेदारास अनुकूल असल्याचा आरोप नागरिकांकडून केला जात आहे. दरम्यान, संबंधित ठेकेदार बांधकामासाठी पाण्याचा उपसा कुठून करतो, याचा तपास लावण्यासह तत्काळ बांधकाम थांबवणे अपेक्षित आहे. शिवाय, पाण्याचा गैरवापर केल्याप्रकरणी संबंधितांवर गुन्हे नोंदविण्याची मागणी नागरिकांकडून केली जात आहे. रस्तेबांधणी अत्यावश्यक आहे. मात्र, मे व जून महिन्यांत पाण्याची तीव्र टंचाई लक्षात घेता, शासकीय योजनेतून राबवण्यात येणाऱ्या बांधकामांना स्थगिती देण्याची आवश्यकताही वर्तविली जात आहे.